‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृपितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन मातृपितृ पूजन आयोजन समितीच्या सदस्या पूजा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून तरुण-तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकले जातात. या दिवशी मातृपितृ पूजन दिवस साजरा केला तर तरुण-तरुणी व युवक वर्ग वाईट संस्कारातून निघून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल. आपली मुले वाईट संस्कारात फसली जावी, असे कोणत्याही पालकांना वाटत नाही. आई-वडील व गुरुजनांचा सन्मान केला तर मुलांना मंगलकारी आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे शहरवासीयांनी घरी, शाळेत, महाविद्यालयात मातृपितृ दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. सर्वच काही पाश्चात्य देशातील तेवढे चांगले, अशी आपली भावना बनत चालली आहे. भारतीय संस्कृतीवर होत असलेल्या कुठाराघातामुळे कोटय़वधी भारतीयांचे पतन होत आहे. हे पतन थांबवायचे असेल तर ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी १४ फेब्रुवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये मातृपितृ पूजन दिवस साजरा करण्याचे जाहीर केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी समितीचे सदस्य आशीष कटरे, प्रवीण कुळकर्णी, मुकेश अग्रवाल, रघुनंदन अग्रवाल उपस्थित होते.