बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सोमवारी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेच्या सभापतींकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. राज्यसभेच्या शिस्तपालन समितीकडून विजय मल्ल्या यांना आपली बाजू मांडण्यासाठीची नोटीस पाठविण्यात आली होती. बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसल्याने मल्ल्या यांच्या खासदारकीवर गदा येणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र, तसा निर्णय येण्याआधीच मल्ल्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवून दिला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर संप्पत्तीची संपूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.