राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन येत्या ९ व १० फेब्रुवारीला कोरपना येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षांला समर्पित हे दोन दिवसीय अकरावे राज्यस्तरीय संमेलन ज्येष्ठ गुरुदेव सेवक राजेंद्र मोहितकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच चंदू पाटील मारकवार, माजी संमेलनाध्यक्ष गीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुनील नाथे, लिंगा रेड्डी गड्डमवार, नीलकंठ कोंरागे, उत्तम पेचे, सरपंच बंडू गेडाम, स्वागताध्यक्ष सुधाकर पिदूरकर, मुख्य प्रबंधक शंकर मंडेलिया उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या चैतन्य युवा पुरस्कार व विशेष पुरस्काराचे वितरण, पुस्तक प्रकाशन होईल. १० फेब्रुवारीला सकाळी सामुदायिक ध्यानपाठ झाल्यानंतर योगासन निसर्गोपचार मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. नवलाजी मुळे, विनायक साळवे विचार मांडतील. त्यानंतर सेवकराम मिलमिले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामगीता आणि मी अनुभवकथन व संकल्पयात्रा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता ‘वर्तमान स्थिती व राष्ट्रसंत साहित्य’ हा परिसंवाद डॉ. प्रा. राजन जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात अॅड. सारिका जेनेकर, प्रा. राजन मुसने, संतोष नरूले, राजू देवतळे, प्रा. धनंजय काळे सहभागी होतील. समारोपीय कार्यक्रम आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी खासदार हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. विनायक इरपाते, डॉ. यशवंत कोकोडे उपस्थित राहणार आहेत.