लग्नसमारंभाच्या माध्यमातून मिळालेल्या आहेराच्या रकमेतून एका नवदाम्पत्याने आदिवासी भागातील एका शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.

ठाणे येथील रहिवासी शर्विन ठाणेकर आणि सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने विवाहप्रसंगी मिळालेल्या आहेरातून वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथे शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या आश्रमशाळेत दोन वर्गखोल्या बांधल्या. इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्चून या दोन वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.

ठाण्यातील मिलिंद आणि वीणा हे ज्ञाते दाम्पत्य गेली काही वर्षे वाडा तालुक्यातील नांदणी-गायगोठा या दुर्गम भागातील अरविंद स्मृती संचालित अनुदानित आश्रमशाळेला नियमित भेट देत आहेत. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. औषधे, अंथरुणे इतर वस्तू ते देत असतात.  १९९८ मध्ये सुरू झालेल्या या आश्रमशाळेत ६५० आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. आश्रमशाळेत वर्गखोल्यांची कमतरता जाणवते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ वीणा ज्ञाते यांची कन्या सायली हिचे ठाण्यातच राहणाऱ्या शर्विन ठाणेकर यांच्याशी लग्न ठरले. त्या वेळी त्यांनी शर्विनच्या घरच्यांशी संवाद साधून लग्नात मिळणाऱ्या अहेराची रक्कम आश्रमशाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी खर्च करण्यास प्रेरित केले आणि लग्नपत्रिकेतही आहेराची रक्कम या कार्यासाठी वापरणार असल्याची कल्पना अन्य आप्तांना  दिली.

या नवदाम्पत्याने  लग्नात मिळालेल्या अहेराच्या रकमेत  उर्वरित आवश्यक असणाऱ्या रकमेची भर घालून वर्गखोल्यांचे बांधकाम केले.