जिल्ह्यातील अमरावती- सुरत महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यु झाला. मृतांमध्ये एक शालेय विद्यार्थी तसेच नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील माय-लेकीचा समावेश आहे. नवापुर तालुक्यातील रेल्वे फाटकाजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास अपघात झाला. रांयगण गावाहुन शालेय विद्यार्थ्यांना घेऊन नवापूरला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाला समोरून भरधाव आलेल्या मालमोटारीने धडक दिली. त्यात एक विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार विद्यार्थी जखमी झाले. मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव इलेश वसावे असे आहे.
तो इयत्ता सहावीत तो शिक्षण घेत होता. अ‍ॅपेरिक्षातील गिरीश गावित, तुषार वसावे, तेजस वसावे, मगन गावित हे चार विद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवापुरच्या शिवाजी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत.
अपघाताची दुसरी घटना याच महामार्गावर गुजरातमधील गांधीनगर गावाच्या रेल्व फाटकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. भरधाव चाललेली कार चालकाकडून नियंत्रित न झाल्याने उलटली. या अपघातात मालेगाव कॅम्प परीसरात वास्तव्यास असलेल्या प्रियंका श्रॉफ व संध्या श्रॉफ यांचा मृत्यू झाला.