नवी दिल्ली : जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीच्या दरासंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढती अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळा आणि वाढत्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेची चाल अपेक्षेपेक्षा संथ राहण्याची शक्यता असून, सुधारणांमध्ये अपेक्षित गती दिसत नसल्याने जागतिक बँकेने बुधवारी हा खालावलेला अंदाज जाहीर केला. येत्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ८.५ टक्के वेगाने वाढेल, असा जागतिक बँकेने यापूर्वी अंदाज वर्तविला होता. याचबरोबर अफगाणिस्तान वगळून दक्षिण आशियाच्या वाढीच्या अंदाजात देखील घट करत तो ६.६ टक्के राहील, असे सुधारित अनुमान वर्तविले आहे. देशावरील ओमायक्रॉनचे संकट टळले असले तरी वाढत्या महागाईच्या दबावामुळे देशांतर्गत मागणीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर आधी वर्तवलेल्या ८.५ टक्क्यांच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी घट होऊन तो ८ टक्क्यांवर येण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तविली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा पुन्हा बाधित होण्याच्या भीतीने वाढलेल्या किमतीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला आगामी काळात बसण्याची शक्यता आहे.