जिल्ह्यचे मिनी मंत्रालय असलेल्या जि. प.ची निवडणूक येत्या मार्चमध्ये होणार आहे. तत्पूर्वी जि. प. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार जि. प. अध्यक्षपदाची सूत्रे नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) चेहऱ्याकडे असतील. जि. प.वरील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वपक्षीयांमधून मोच्रेबांधणी सुरू होणार आहे. काँग्रेसलाही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे.
राज्यातील २६ जि. प.च्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. त्या दृष्टीने या सर्व जि. प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये उस्मानाबाद जि. प.चे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव झाले. मार्चमध्ये जि. प. निवडणुकीची रणधुमाळी सुरूहोणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमधून तयारी सुरू होणार आहे.
सध्या जि. प.त काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत. काँग्रेसचे १९, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे १८, शिवसेना १४, तर भाजपचे केवळ ३ असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना व भाजपच्या मदतीने काँग्रेस मागील ४ वर्षांपासून जि. प.त सत्तेवर आहे. राष्ट्रवादीची सत्ता आपल्या ताब्यात खेचून घेण्यात काँग्रेसला मागील वेळी यश आले. भाजपला सुजितसिंह ठाकूर यांच्या रूपाने जिल्ह्यातील पहिला आमदार लाभल्यामुळे होऊ घातलेल्या जि. प. निवडणुकीत भाजपचा टक्का वाढवण्यासाठी ठाकूर यांची रणनीती लक्षवेधी ठरू शकते. जि. प.वर आपला झेंडा फडकावण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातच चुरस असेल. या बरोबरच जिल्ह्यात शिवसेना व भाजपत सुरूअसलेला संघर्षही आगामी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जि. प. निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ८ नगरपालिकांसाठी वर्षांअखेरीस निवडणूक लागणार आहे. जि. प.पूर्वी नगरपालिकेची निवडणूक असून अनेकांना पक्ष संघटन बांधण्याची यातून संधी मिळणार आहे. किंबहुना पालिका निवडणूक ही जि. प.साठी रंगीत तालीमही ठरू शकते. सध्या आठपकी भूम, उस्मानाबाद, तुळजापूर या तीन पालिकांवर राष्ट्रवादी, नळदुर्ग, उमरगा व मुरुममध्ये काँग्रेस, तर परंडा व कळंब पालिकेवर सेनेचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने शिवसेना, भाजपसह काँग्रेसलाही धोबीपछाड दिली. जिल्ह्यात बाजार समित्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील आपला मतदार बांधून ठेवला. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मिळालेला विजय राष्ट्रवादीचा आत्मविश्वास बळकट करण्यास पुरेसा असल्याचे या पक्षाचे कार्यकत्रे सांगतात.