कोलकाताचा सुजॉय दास, जम्मू काश्मीरची सायमा बानो, आसामची हिमाश्री दास हे अगदी विशी- पंचविशीतले तरुण. आज सेवाभावी वृत्ती ठेवून घरापासून दूर राहून समाज बदलासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताहेत, गेल्या एक दोन वर्षांतल्या त्यांच्या कामाला यशही आले आहे आणि म्हणूनच पुढे खूप काही करायची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली आहे. या त्यांच्या भरारीला खतपाणी देत आहे, ‘पिरामल ग्रुप’ आणि या समूहाचा आर्थिक दानकार्य करणारा विभाग म्हणजेच पिरामल फाऊंडेशन.

सुजॉय आयआयटी, खरगपूरचा विद्यार्थी. पण या शिक्षणानेच त्याला वेगळे काही तरी वाट चोखाळायला प्रवृत्त केले. त्याला पिरामल फाऊंडेशनच्या दोन वर्षाच्या गांधी फेलोशिपची माहिती मिळाली. चाचण्या-मुलाखती यातून त्याची निवड झाली आणि आता तो दूर झारखंडला पर्यावरणासाठी काम करतो आहे. त्याचे म्हणणे, पूर्वी नळ गळत असायचे, पाणी वाया जायचे पण त्यातले गांभीर्य त्याला कळत नव्हते, परंतु आता एका थेंबाचेही महत्त्व लक्षात येतेय आणि ते वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. सायमा बानो ही तरुणी ‘एमएसडब्लू’ करून समाजसेवा करायचे या ध्येयाने पछाडलेली. पिरामल फाऊंडेशनच्या ‘करुणा फेलोशिप’ची माहिती कळल्यावर तिने अर्ज केला. घरून परवानगी मिळणे कठीण होते. कारण कुपवाडा जिल्ह्यात जाऊन काम करायचे होते. पण आज ती लहान मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण करण्याचे काम करते आहे. तो भागच असा की, तेथे लहान मुले शाळेत आणणे हेच मोठे आव्हान आहे. नवनवीन प्रयोग करत ती मुलांना अभ्यासाची गोडी लावते आहे. तिला जास्तीत जास्त मुलांना शाळांमध्ये आणायचे आहे. कारण शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे, हे तिला पटलेले आहे. सुजॉय, सायमा सारखे प्रशिक्षण घेतलेले, घेत असलेले ३,००० मुले आणि ५०० मुली या फेलोशिपमुळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करत आहेत. सक्षम भारत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
Transaction of more than 1000 crore shares of Vodafone Idea a private sector telecom company
व्होडा-आयडियाच्या उलाढालीचा विक्रम; १,००० कोटी समभागांचे व्यवहार
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

देशाला सशक्त बनविण्यासाठी आपल्या नागरिकांना अधिक सक्षम करायला हवे हे ध्येय समोर ठेवून ‘पिरामल ग्रुप’चे अध्यक्ष अजय पिरामल आणि उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल यांनी ‘पिरामल फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेली १६ वर्षे विविध उपक्रम सुरू केले आहेत. फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नटराज यांनी या उपक्रमांची माहिती सांगितली. त्यात आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘अनामय’, लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ११२ जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या लोकांसाठी ‘ॲस्पिरेशनल भारत कोलाबरेटीव्ह’ (एबीसी), इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना जोडण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले ‘डिजिटल भारत कोलाबरेटीव्ह’ आणि नुकतीच जयपूर, राजस्थान येथे ज्याची पायाभरणी करण्यात आली ते ‘पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप’ यांचा या उपक्रमात समावेश आहे. या स्कूलमधून ५० हजार लोकांना नेतृत्व- प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जयपूरमध्ये ३२ एकर जागेवर येत्या दोन वर्षांत ‘पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप’ उभारले जाणार असून, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय प्रशिक्षण, तसेच सुविधा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये बदल घडवून आणणे, जलसुरक्षा वाढवणे आणि पर्यावरणासाठी शाश्वत पद्धतींना चालना देणे, डिजिटलायझेशन आणि तळागाळातील उपक्रमांद्वारे कायदेशीर प्रणाली सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने समावेशकतेवर भर देणे आदी या ‘पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप’ची उद्दिष्टे आहेत. हे सर्व करण्यामागे आमचा ‘सेवा-भाव’ असल्याचे अजय पिरामल यांनी सांगितले.

ते म्हणाले, “राजस्थानमधील बगर या झुंझुनातील छोट्याशा गावात राहणारे माझे आजोबा ५० रुपये घेऊन साधारण ८० वर्षांपूर्वी मुंबईला गेले. उद्योग सुरू केला आणि जेव्हा ते परत आपल्या गावी आले तेव्हा गावातल्या मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. त्यात हरिजन मुलगाही होता आणि नंतर त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या काळात हे धाडसच होते, पण ते त्यांनी केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेत वडिलांनीही उद्योग सुरू केला. यंदा त्यांची जन्मशताब्दी आहे. त्याच निमित्ताने त्यांनी लावलेले हे सेवावृत्तीचे रोप आम्ही अधिक मजबूत करत आहोत. शिक्षणाचे महत्त्व कळणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येणे हे आमचे भाग्य. स्वातीला (पिरामल) लग्नानंतर डॉक्टर होण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिले.कारण त्यामुळे रुग्णालय उघडता येईल, हा त्यांचा उद्देश. मीही माझ्या वयाच्या २२व्या वर्षापासून टेक्सटाइल उद्योगातून कामाला सुरुवात केली. आज आम्ही जे काही कमावले आहे त्यातला वाटा गीतेतील शिकवणुकीप्रमाणे समाजालाही देत आहोत. माझ्याबरोबर माझी मुले तर कामात सहभागी आहेतच, परंतु माझी नातवंडेही या सेवावृत्तीत घडत आहेत, याचा मला अभिमान आहे.”

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृ्ष्टीने काय करायला हवे असे विचारले असता पिरामल म्हणाले, “ भारतात सुमारे ९ टक्के लोक आदिवासी आहेत. ते अनेक सोयीसुविधांपासून आजही वंचित आहेत. विशेषत: त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासन व्यवस्था आहेच. आम्ही देशभरात जे काम सुरू केले आहे, ते सध्या असलेली व्यवस्था प्रभावी कशी होईल हे पाहते. महाराष्ट्रात पालघर, वाडा येथे आमचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. पूर्वी तेथे काम करायला जाण्यास कुणी उत्सुक नसायचे, पण आता बदल होत आहे. देशातील प्रत्येकापर्यंत सोयी पोहोचल्या पाहिजेत. तळागाळापासून सगळ्यांचा विकास झाला तरच ती संपूर्ण भारताची प्रगती ठरेल. भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे, सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे. कोणत्याही परदेशी लोकांना तुम्ही विचाराल तर गुंतवणूक करण्यासाठी भारत सर्वाधिक चांगला देश असल्याचे ते सांगतील. मी अनेकदा म्हटले होते, की पेन्शन फंड, प्रॉव्हिडन्ट फंड, ईपीएफओमधील रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. ते अधिक वेगाने, सहजपणे होणे गरजेचे आहे.
बेरोजगारीची समस्या पाहता आजच्या तरुणांविषयी तुम्ही काय सांगाल? यावर पिरामल म्हणाले, की अर्थव्यवस्था आज जशी वाढते आहे ती तशीच वाढत राहाणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच रोजगारही वाढतील. तसेच तरुणांच्या शिक्षणासाठी आरोग्य व्यवस्थेसाठी काम करत राहाणे आवश्यक आहे. आज ग्रामीण भागात फक्त ३० टक्के स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. सगळ्या स्त्रियांना तो फायदा मिळाला तर त्यांना कुणावरही, अगदी नवऱ्यावरही अवलंबून राहावे लागणार नाही. देशाची सर्वबाजूंनी प्रगती व्हायची असेल तर स्त्रियांची प्रगती होणे गरजेचे आहे.