फारुक नाईकवाडे राज्य लोकसेवा आयोगाकडून घोषित वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिल रोजी प्रस्तावित आहे. राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, कृषी सेवा, अन्न व नागरी पुरवठा विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांतील राजपत्रित पदे या या सर्व पदांसाठी पूर्व परीक्षेचा टप्पा संयुक्तपणे आयोजित करण्यात येतो. या परीक्षेच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. सुरुवात सामान्य अध्ययन पेपर दोन सी सॅट पासून करू या. परिचय सामान्य अध्ययन पेपर दोन सी सॅट हा नागरी सेवा अभिवृत्ती चाचणीचा पेपर आहे. या पेपरच्या माध्यमातून उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन तपासले जाते. पेपपरमध्ये ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांना विचारपूर्वक प्रतिसाद द्यायचा असतो. पाठांतराच्या वा स्मरणशक्तीच्या आधारावर या प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. एकूण २०० गुणांसाठी ५६ पानी पेपरमध्ये एकूण ८० प्रश्न प्रत्येकी २.५ गुणांसाठी विचारण्यात येतात. आणि त्यातील ७५ प्रश्नांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक चतुर्थाश (२५ टक्के) गुण वजा करण्यात येतात. पेपरचे व प्रश्नांचे हे स्वरूप लक्षात घेता पेपर एकच्या तुलनेत हा पेपर जास्त अवघड, आव्हानात्मक समजला जातो. पूर्वानुभव मागील वर्षांच्या पूर्व परीक्षेच्या निकालातील कट ऑफ लाईनच्या विश्लेषणावरून पेपर दोन हा परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये पेपर एकपेक्षा जास्त योगदान देतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. उमेदवारांना प्रत्येकी २०० पैकी पेपर एक मध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५ तर पेपर दोन मध्ये ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. म्हणून सी सॅट हा अनावश्यक दडपण न घेता तयारी करायचा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण उमेदवारांनी सोडविलेल्या प्रश्नांचे आणि त्यांच्या गुणांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात. निगेटिव्ह मार्किंगच्या हिशोबाने ठरावीक मार्क मिळविण्याचे उद्दिष्ट ठरवून घेतले आणि त्यासाठी किती प्रश्न सोडवावे लागतील हे लक्षात घेऊन पेपर सोडविला अशा उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत. ज्या उमेदवारांनी जास्तीत जास्त पेपर कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविला अशा विद्यार्थ्यांकडून ‘सिली मिस्टेक’ प्रकारातील चुका जास्त झालेल्या दिसून येतात. परिणामी जास्त प्रश्न सोडवूनही नकारात्मक गुणपद्धतीमुळे मार्क खूप कमी झालेले आहेत. ठरावीक मार्काचे उद्दिष्ट ठरविले की किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते. आणि ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या लहानशा चुका टाळता येतात. एकूण ८० पैकी ५ निर्णयक्षमतेचे प्रश्न वजा केले तर ७५ पैकी ५० ते ६० प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट असायला हरकत नाही. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून आपले कम्फर्ट झोन आणि आव्हानात्मक वाटणारे प्रश्नप्रकार शोधले आणि त्यावर आधारीत सराव केला त्यांना सी सॅट पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. सर्वसाधारण तयारी वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडविणे या दोन्हीसाठी योजना ठरवायला हवी. या पेपर मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर सराव हाच एकमेव उपाय आहे. केवळ बरोबर उत्तरे शोधण्याचाच सराव नव्हे तर आणि वेळेच्या मर्यादेत बरोबर उत्तरे शोधण्याचा सराव. त्यामुळे वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल. आधी प्रश्नांचे स्वरूप ओळखीचे होईपर्यंत वेळ न लावता त्याच प्रकारचे प्रश्न सोडवायचे. एकदा प्रश्नप्रकार ओळखीचा झाला की मग वेळ लावून कमीत कमी वेळेत तो सोडवायचा सराव करायचा. अशी तयारी जास्त परिणामकारक ठरते. सरावासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितका सक्सेस रेट जास्त असतो हे खरेच. पण जेवढय़ा प्रश्नपत्रिका सोडविल्या असतील त्यांचे विश्लेषण करून स्पर्धेत आपण कुठे आहोत आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा आवश्यक आहे. या विश्लेषणातून कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घेता येतात आणि तयारीची दिशा ठरवता येते. सरावामध्ये सर्वात आधी तयारी करावी थोडय़ा फार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांची, त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांचा सराव करावा. पेपर दोनमध्ये ५३ ते ६० पानी पेपर व ऐनवेळी आकलन व विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने खूपच कठीण वाटणारे प्रश्न ऐनवेळच्या तयारीचा भाग होऊ शकत नाहीत. अशा घटकांसाठी थोडा जास्त वेळ लागतो व त्यांचा समावेश लाँग टर्म व्यवस्थापनामध्ये असणे आवश्यक असते. आयोगाचा साधारणपणे ५० पेक्षा जास्त पानांचा पेपर १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. सलग सोडवत गेले तर ८० व्या प्रश्नापर्यंत पोचणासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरुवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन लक्षात येते. अवघड प्रश्न / उतारा बाजूला ठेवून मार्क देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते. सी सॅट मध्ये १०० ते १२० गुण मिळवायचे असतील उत्तीर्ण होण्यासाठी २५ टक्के निगेटीव्ह मार्किंगचे गुण वजा करता एकूण किमान ४० ते ५० प्रश्नांचे गुण आवश्यक ठरतील. त्यासाठी निगेटीव्ह मार्किंग नसलेले शेवटचे पाच प्रश्न आणि निगेटीव्ह मार्किंग असलेले कमाल ५० ते ५५ प्रश्न असे एकूण जास्तीत जास्त ५५ ते ६० प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट ठरवणे योग्य ठरेल.