-नीलिमा किराणे
नवराबायकोच्या नात्यात नव्याची नवलाई सरल्यानंतर पुष्कळदा भ्रमनिरासाचा टप्पा येतो. लग्न मोठ्या वयात केलं असेल, तर हे लवकर घडण्याची शक्यता अधिक. नात्यांमधल्या बेबनावात ‘माझंच चुकतंय का?… माझ्याच अपेक्षा अवास्तव आहेत का?’ असं वाटू लागतं. अशा वेळी जोडीदाराशी तर बोलायला हवंच, पण त्याबरोबर आपल्याला पडलेले प्रश्न बदलून पाहायला हवेत. ‘मला नेमकं हवंय काय?’ या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तर विचारांचा गरगरून टाकणारा गुंता सोडवता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रसिकाचा निर्णय झाल्यावर मनाचा हिय्या करून तिनं तो प्रशांतना सांगितला. ‘‘मला वाटतं, आपण थोडे दिवस वेगळे राहून पाहू या…’’ या शब्दांचा प्रशांतना धक्का बसल्यासारखं दिसलं नाही. जणू त्यांना याची कल्पना होती. क्षणभर थांबून ते म्हणाले, ‘‘तू जसं ठरवशील तसं. मी थोड्या दिवसांनी गावाकडच्या जुन्या घरात शिफ्ट होईन. आधी दुरुस्त्या करून घेतो.’’ आणि त्यांनी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. ते लेखक होते आणि गावात राहून काम करणं त्यांना आवडणार होतं. शहरातलं हे घर तसंही रसिकाचं होतं. तिची नोकरीही इथेच होती. ताबडतोब वेगळं राहणं अपेक्षितही नव्हतं.

निर्णय होऊनही रसिकाच्या मनाची घालमेल चालूच राहिली. पाच वर्षांपूर्वी प्रशांतची ओळख झाली, तेव्हा त्यांचं वय सत्तावन आणि रसिका बेचाळीस वर्षांची होती. ती तीन बहिणींमधली थोरली. त्यामुळे एकविसावं वर्ष लागल्याबरोबर लग्न लावून घरचे मोकळे झाले होते. ‘मनं जुळणं’ वगैरे काही प्रकार नव्हताच. वर्षभरातच तिच्या नवऱ्यानं एका श्रीमंत मुलीशी संधान जुळवल्याचं समजल्यावर रसिकानं त्या लग्नातून मोकळं होण्याचा निर्णय घेतला. बँकेत लागली, स्वत:ची ओळख निर्माण केली. यथावकाश घरही घेतलं. चाळिशीनंतर मात्र तिला आपलं मन जाणणारं, प्रेमाने बोलणारं कुणी तरी आपलं माणूस असावंसं वाटायला लागलं. त्याचदरम्यान एका कार्यक्रमात तिची प्रशांतशी ओळख झाली. विचार जुळले, भेटी वाढल्या. कवीमनाचा हा माणूस तिला आवडला. त्यांची विद्वत्ता, व्यासंग, वक्तृत्व यांमुळे ती दिपून गेली. प्रशांतही तिच्यात गुंतले. तिच्यासारखी स्वतंत्र विचारांची, मुद्देसूद वाद घालू शकणारी बिनधास्त स्त्री त्यांना यापूर्वी भेटली नव्हती. ते विधुर होते. पत्नीच्या मृत्यूनंतर आयुष्यात दोन स्त्रिया येऊन गेल्याचंही त्यांनी रसिकाला मोकळेपणानं सांगितलं. त्यांचा प्रामाणिकपणा तिला आवडला. प्रशांतना त्यांच्या नात्यासाठी लग्नाची गरज वाटत नव्हती. पण रसिकाला लग्नाशिवाय ‘तसंच’ राहणं ‘अपवित्र’ वाटत होतं. अखेरीस तिच्या हट्टामुळे ते लग्नाला तयार झाले.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले : सुट्टी!

त्यानंतरचे काही महिने मजेत गेले. भरपूर गप्पा, भटकणं, मैफली… रसिका स्वयंपाकात जास्त रमणारी नसली, तरी प्रशांतच्या खवय्येपणामुळे ती हौसेनं बनवायला लागली. मात्र नवी नवलाई ओसरायला लागल्यावर तिला काही गोष्टी खटकायला लागल्या. लग्नाआधी आपल्या स्वतंत्र विचारांचं कौतुक करणारे प्रशांत आता वादात हरायला लागल्यावर चवताळतात असं तिला जाणवायचं. संवाद म्हणजे बहुतेकदा त्यांचं म्हणणं ठामपणे सिद्ध करणंच. बोलण्यात बऱ्यापैकी टोमणे, ‘लेबलिंग’, तिच्यावर टीका असायची. तिनं बँकेतलं काहीही सांगितलं, तरी ‘त्यात तुझंच कसं चुकलं असणार,’ हे ते दाखवून द्यायचे.

संध्याकाळी रसिका ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी घरी बऱ्याचदा त्यांच्या मित्रांचा अड्डा असायचा. त्यांच्या रोजच्या तात्त्विक चर्चा आणि तिनं सगळ्यांची सरबराई करणं गृहीत! हळूहळू रसिका वैतागली. साडीसारखे पारंपरिक कपडे ती स्वत:च्या आवडीविरुद्ध प्रशांतना आवडतं म्हणून वापरायची. पण तिनं आधुनिक ड्रेस घातल्यावर, न बोलताही त्यांच्या कपाळावरची आठी तिला सवयीनं समजायला लागली होती. आपल्याकडून नम्र, ‘पतिपरायण पत्नीपणा’च ते गृहीत धरायला लागलेत का?… स्त्री-स्वातंत्र्याच्या गप्पा फक्त स्टेजवरच्या भाषणात आणि प्रत्यक्षातलं वागणं पुरुषप्रधान, असं रसिकाला वाटू लागलं. हा दुटप्पीपणा तिला झेपेना. त्यामुळे मूळचा जिव्हाळा असला, तरी पुढे पुढे दोघांमधला संवाद, ओढ, जवळीक आटत गेली.

या बदलांबद्दल ती मैत्रिणींशी बोलली तेव्हा, ‘लग्नानंतर प्रियकराचं नवऱ्यात असंच ‘रूपांतर’ होतं! त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं,’ असं त्यांनी हसत सांगितलं. ‘आपल्याच नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा जास्त आहेत कदाचित…’ असं वाटून रसिका गप्प बसली. पण इतकी वर्षं एकटी राहिलेल्या, नोकरीत जबाबदारीचं पद सांभाळणाऱ्या तिला, घरातल्या या सततच्या दुय्यमपणाचा ताण यायला लागला. व्यक्ती म्हणून किंमत नसणं झेपेना. रोज काही ना काही घडत, साठत राहिलं. घुसमटीचा उद्रेक व्हायला लागला. आपल्याला कशाचा त्रास होतोय हे प्रशांतना ती कधी आपलेपणानं सांगायची. कधी असहाय वाटून तिचा आवाज चढायचा, रडू यायचं. प्रशांत नेहमीच शांत असायचे. त्यांच्या मते ती छोट्या गोष्टी मोठ्या करून मनाला लावून घेत होती. प्रशांतच्या बुद्धी आणि प्रामाणिकपणाबद्दल आदर असल्यामुळे त्यांचं म्हणणं पटवून घ्यायचाही तिनं प्रयत्न केला. इतक्या वर्षांनी आपल्या पसंतीचा नवरा मिळूनही आपण तक्रारीच करतोय का?… आपल्यातच प्रॉब्लेम आहे की आपल्याला होणारा त्रास खरा आहे? या विचारानं ती गोंधळल्यासारखी वागायला लागली. तिचा आत्मविश्वास हरवला.

आणखी वाचा-माझी मैत्रीण : जिवाभावाची…

एके दिवशी तिला दुकानात अचानक बँकेतली पूर्वीची मैत्रीण, लग्नानंतर परगावी राहात असलेली मनाली भेटली. मिठी मारून म्हणाली, ‘‘रसिका, बरी आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कुठे गेला? अगं, आजही मी अडचणीच्या वेळी तुझी आठवण करून निर्णय घेते… आणि तू अशी खचलेली का दिसतेयस?’’

रसिका हादरलीच. आपल्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जाणवण्याइतपत संपलाय? अशा आयुष्यासाठी आपण लग्न केलं का?… तिनं घरी आल्यावर प्रशांतना विचारलं, ‘‘आपल्यात आता पूर्वीसारख्या गप्पा का होत नाहीत?…’’

‘‘पूर्वी अधूनमधून भेटायचो आपण. आता नवलाई संपली. एकमेकांची मतंही माहीत झालीत… आणि तू कायम बिथरलेली असतेस.’’ हे त्यांचं उत्तर.

‘काय करू?’च्या चक्रव्यूहात रसिका गरगरायला लागली. या बुद्धिमान, सर्जनशील माणसावर तिनं मनापासून प्रेम केलं होतं. शिवाय त्यांचं वय जास्त, त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास. तिच्या प्रेमात, ‘त्यांची काळजी घ्यायला हवी,’ हादेखील भाग होता. आता त्यांना वाऱ्यावर सोडायचं?… लग्न करण्याचा आग्रहही आपलाच आणि मोडणारही आपणच. इतकी मनमानी?… या प्रश्नांत ती अडकली.

आनंदानं राहणं जमेचना, तेव्हा ‘थोडे दिवस वेगळं राहून पाहू,’ हा पर्याय तिला सुचला. त्या दिवसांनंतर प्रशांतचं वागणं जाणवण्याएवढं बदललं. पूर्वीसारखे कधी हास्यविनोद, थोड्या गप्पा, तिची चौकशी ते करायला लागले. गेली चार वर्षं आपण एवढ्यासाठीच तर आसुसलेले होतो. वेगळं राहायचं ठरवल्याबरोबर त्यांची समज जागी कशी झाली?… याचं नवल वाटत असतानाच अचानक रसिकाला प्रशांतनं पूर्वपत्नीबद्दल सांगितलेलं काही आठवलं- ‘‘सुरेखा ‘पतिपरायण’ होती. आमची मैत्री नव्हती. ती तिच्या कामांत असायची, मी माझ्या. संवादही गरजेपुरताच. डॉक्टरांनी जेव्हा ‘ती काही दिवसांची सोबती आहे,’ असं सांगितलं, तेव्हा शेवटच्या दिवसांत मी तिची काळजी घेतली. गप्पा मारल्या, तिला हसवलं. जाताना ‘यांनी माझ्यासाठी किती केलं,’ या समाधानात ती गेली. कुणाच्याही निरोपाच्या आठवणी चांगल्या असाव्यात असं मला वाटतं…’’ हे ऐकून तेव्हा रसिकाचं मन भरून आलं होतं खरं, तरी काही तरी खटकलं होतंच. आज तिला ते एकदम उलगडलं… याचा अर्थ, बायकोशी चांगलं कसं वागतात हे यांना व्यवस्थित कळतं! मग एवढे दिवस त्यांनी न समजण्याचं सोंग का आणलं? ‘तुझ्याच अपेक्षा चुकीच्या’ असं का बिंबवत राहिले?…

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!

‘‘तुम्हाला माझा कंटाळा आलाय का? मला असंच वातावरण तर हवंय आपल्यात… आधीच्या पत्नीच्या शेवटच्या दिवसांत जर तुम्ही असं वागू शकला होतात, तर…’’ रसिकानं प्रशांतना विचारलं.

‘‘रसिका, मी स्वत:च्या धुंदीत जगणारा माणूस आहे. दुसऱ्याचा विचार करून वागण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात. मला तू आवडतेस. तुझ्यासाठी स्वत:ला बदलणं मी काही दिवसांसाठी जमवू शकतो. पण कायमचं शक्य नाही. तुला ज्या गोष्टी मोठ्या वाटतात, त्यावर जास्त विचार करणं मला वेळ घालवणं वाटतं. तू ठरव…’’

प्रशांतच्या उत्तरानं रसिका थक्कच झाली. यांना प्रामाणिक म्हणावं, की दुटप्पी, की आत्मकेंद्री?… त्यांना आपण नसल्यानं फरक पडत नाही? की निर्णयाची जबाबदारी नकोय?… पण आता या प्रश्नांना अर्थच उरला नव्हता. प्रशांत जसे होते तसे होते. ‘रसिका आवडते, पण मला बदलायचं नाहीये,’ हे त्यांनीच मान्य केलं होतं. अजूनही जिव्हाळा आहे, सोबत हवीय, पण तसं वागता येत नाहीये. त्याचा त्रास आपल्यालाच जास्त होतोय. प्रशांतची प्रेमाची पद्धतच आपल्यापेक्षा वेगळी आहे. ते बुद्धिवादी आहेत, भावना कमीच. म्हणजे आपल्याला भावनिकदृष्ट्या आत्मनिर्भर होता आलं, तर कदाचित आत्मविश्वास न संपवता त्यांच्याशी वागता येईल. दूर राहिल्यावर त्यांनाही स्वत:त बदल करण्याची गरज कदाचित जाणवेल किंवा नाहीही जाणवणार…

याचा अर्थ असा, की आता आपले प्रश्न बदलायला हवेत. ‘अशा स्वभावाबरोबर स्वत:चा आत्मविश्वास जिवंत ठेवून राहणं आपल्याला जमेल का? आणखी वीसेक वर्षं? आपल्यासाठी सोबत, स्वातंत्र्य, आत्मविश्वास यांचा प्रधान्यक्रम कसा आहे? मग त्यासाठी सतत एकत्र राहण्याचा अट्टहास करायचा, की ब्रेक घेऊन नात्यावर नव्यानं विचार करायचा? आपल्या अपेक्षांवरही काम करायचं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील…

आता रसिकाच्या मनातलं, ‘काय करू? माझं चुकतंय का?,’चं चक्र थांबलं होतं. मनालीचा आपलेपणा आणि प्रशांतचा प्रामाणिकपणा याचे तिनं मनोमन आभार मानले. त्यामुळेच तर ‘आपल्याला काय हवंय? काय जमेल? आणि ते कसं शोधायचं?’ याचा रस्ता तिला दिसला होता.

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itishree thinking about what do i really want is very important in relationship mrj