अॅड. निशा शिवूरकर यांचा ‘महिला व्होट बँकेचा शोध’ हा लेख (१३ एप्रिल) वाचला. प्रश्नच आहे, कशी होणार आहे ‘महिला व्होट बँक’? लोकप्रतिनिधींमध्ये स्त्रियांचं प्रमाण कमीच आहे आणि रस्त्यावर उतरून स्त्रियांचे प्रश्न मंडणारं नेतृत्व तर इतिहासजमाच होईल असं वाटतं. पूर्वी स्वच्छ, साधी राहणी ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली एक ओळख होती. एके काळी रण गाजवलेल्या मृणाल गोरे, निशिगंधा मोगल, अहिल्या रांगणेकर, शोभाताई फडणवीस, विजया राजे सिंधिया या स्त्रियांचे प्रश्न समजणाऱ्या होत्या. आज ‘महिला व्होट बँक’ तयार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याची कळकळ कुणालाआहे?-धनश्री देव वेगळा संसार थाटण्याचं मूळ ‘स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?’ हा अॅड. रोहित एरंडे यांचा लेख (६ एप्रिल) खूप आवडला. इतकी वर्षं चर्चा न होता हा सामाजिक प्रश्न तसाच राहिला होता. भारतीय एकत्र कुटुंबपद्धतीचं आपण कौतुक करतो, ती भंग का होऊ लागली, याच्या शोधात खरं तर स्वतंत्र संसार थाटण्याची मुळे आहेत. ‘ऊन पाऊस’ या राजा परांजपे यांच्या चित्रपटात हा सांस्कृतिक सांधाबदल योग्य रीतीनं टिपला आहे. अॅड. एरंडे यांनी वर्णन केलेल्या सत्यकथा आणि समस्या हा संस्कृतीची आर्थिक संरचना बदलण्याचा परिणाम आहे. त्याचं उत्तर शोधलं, तर प्रत्येक व्यक्ती उपाय शोधण्याच्या क्षमतेत राहील. अन्यथा ही व्यवस्था कोणाच्या तरी फायद्यासाठी आणि कुटुंबात भेद निर्माण करण्यासाठी कार्यरत राहील.-उमेश जोशी आपल्या माणसांचं ‘असणं’ ‘आपल्या माणसांचं ‘असणं’ हा संकेत पै यांचा लेख (६ एप्रिल) वाचला. आपल्या विकासाच्या दृष्टीनं ते आवश्यक असतं. मी आयुष्यात जी काही प्रगती केली, त्यामागे माझी आई, बहीण, माझ्या इंग्रजी भाषेसाठी मेहनत घेणारे माझे गुरूजी, नोकरीत भेटलेले वरिष्ठ, सहकारी यांचा सहभाग खूप मोलाचा आहे. कंपनीनं जाहीर केलेली मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा माझा विचार होता. परंतु माझे वरिष्ठ आणि एक मित्र यांनी मला त्यापासून परावृत्त केलं. त्याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे मला हे अगदी खरं वाटतं, की आपल्या माणसांचं ‘असणं’ महत्त्वाचं असतंच. -नीता शेरे