पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात शुक्रवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) एका जिल्हा कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले, तर लष्करातील एक जवान शहीद झाला, असे पोलिसांनी सांगितले.

दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी राजपोरा परिसरातील हांजीन गावाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता चकमक उडाली, सुरक्षा दलांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. चकमकीत एक जवान जखमी झाला, मात्र रुग्णालयात तो शहीद झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर घटनास्थळी अधिक कुमक रवाना करण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पाच दहशतवादी ठार झाले. हे दहशतवाही एलईटीशी संबंधित होते आणि निशाझ लोने ऊर्फ खिताब हा जिल्हा कमांडर होता, असे पोलीस महानिरीक्षक, काश्मीर विजयकुमार यांनी सांगितले.  चकमकीत ठार झालेल्यांमधील एक दहशतवादी पाकिस्तानचा होता, मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे, स्फोटके व अमली पदार्थ टाकण्यात पाकिस्तानची लष्कर ए तोयबा व जैश ए महंमद या संघटना सामील आहेत, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशात या माध्यमातून दहशतवाद पसरवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कथुआ जिल्ह्य़ात एका मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दीक्षान्त संचालन प्रसंगी ते बोलत होते. दिलबाग सिंह यांनी सांगितले की, जम्मूत सकाळच्या वेळी जे दोन ड्रोन हल्ले करण्यात आले होते, त्याबात आम्ही अजून कुठलेही ठोस निष्कर्ष काढलेले नाहीत पण इतिहास पाहता या हल्ल्यांमागे तोयबाचाच हात असावा. शस्त्रे, अमली पदार्थ टाकण्याची कृत्ये ही संघटनाच नेहमी करीत असते. त्यामुळे या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. असे असले तरी याबाबत आणखी चौकशी चालू आहे.

साडेपाच किलो स्फोटकांसह जम्मूत दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती, त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, स्फोटके लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने आणली होती व त्यात पाकिस्तानचा हात होता. त्याला पोलिसांनी जाबजबाबानंतर अटक केली असून गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याचा हेतू त्यात होता. जम्मूतील हल्ल्यापूर्वी लष्कर ए तोयबाने अनेकदा ड्रोन्सचा वापर केला होता. त्यात आरडीएक्सचाही समावेश होता. ड्रोनच्या माध्यमातून टाकण्यासाठीच ही स्फोटके होती. ड्रोन विमानांमुळे सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगून ते म्हणाले की, शस्त्रे व स्फोटके टाकण्याच्या कृत्यांचा सुरक्षेला धोका आहे. दहशतवादामुळे आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बळी गेले आहेत. युवकांनी सर्व पातळ्यांवरील दहशतवाद नाकारावा त्यात सामील होऊ नये कारण आतापर्यंत बराच रक्तपात झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात स्थानिक युवकांच्या सहभागाबाबत त्यांनी सांगितले की, तरुणांची दहशतवादासाठी भरती केली जात आहे पण पूर्वीपेक्षा ते प्रमाण कमी झाले आहे. आम्ही युवकांना सकारात्मक दिशा देत असून दहशतवादात सामील युवकांची संख्या आणखी कमी होईल. दहशतवादी व सुरक्षा दले यांच्यातील चकमकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, शांततेचे शत्रू असलेले लोक निरपराध लोकांची हानी करीत आहेत. विविध भागात दहशतवादी गट कार्यरत असून दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आणखी तीव्र मोहिमा राबवण्यात येतील.