छत्तीसगढमधील नारायणपूरमध्ये येथे भारत तिबेट सीमा पोलीस दलातील काही जवानांमध्ये बुधवारी वाद झाला. यानंतर एका जवानानं आपल्या कँपमध्ये गोळीबार केला. यामध्ये कँपमधील ५ जवानांचा मृत्यू झाला. यानंतर त्या जवानानं स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. अचानक झालेल्या या गोळीबारात २ जण जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे.

भारत तिबेट सीमा पोलीस दलातील काही जवानांमध्ये बुधवारी वाद झाला. यानंतर झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नारायणपूरचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस मोहित गर्ग यांनी दिली. तसंच या घटनेत २ जण जखमी झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार रहमान खान नावाच्या एका कॉन्स्टेबलनं आपल्या पाच साथीदारांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी ५ वाहनं आणि एक मशीन जाळल्यानंतर नारायणपूर चर्चेत आले होते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता निर्मितीचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली होती.