कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळीच शेतकऱ्यांकडून गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला होता.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसंच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल असं सांगितलं आहे. दरम्यान किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत.

सकाळी सहा वाजता भारत बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. राजधानी दिल्लीतही बंद पाळला जाईल असं त्यांनी जाहीर केलं आहे.

”शेतकरी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरणार आहेत. भारत बंददरम्यान मार्केट तसंच वाहतूक सेवा बंद असेल,” असं ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं. दुसरीकडे देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपण बंदमध्ये सहभागी नसून मार्केट सुरु राहतील असं जाहीर केलं आहे.