पीटीआय, नवी दिल्ली

वाढत्या आध्यात्मिक पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या, वाराणसी, अमृतसर, पुरी, तिरुपती आणि अजमेरसारख्या शहरांमध्ये मोठमोठय़ा उत्पादक कंपन्यांचा (ब्रँड) विस्तार होऊ लागला आहे. यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कंपन्या उत्पादने आणत आहेत. बांधकाम क्षेत्रातील सल्लागार सीबीआरईने यासंबंधी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आध्यात्मिक पर्यटनाच्या नजरेतून बांधकाम क्षेत्राचा शोध या विषयावरील अहवाल सीबीआरईने जारी केला. देशातील १४ शहरांमध्ये वाढत्या आध्यात्मिक पर्यटनाचा लाभ घेत किरकोळ क्षेत्रातील साखळी कंपन्यांनी पाय रोवले आहेत, यावर या अहवालात भर देण्यात आला आहे. अमृतसर, अजमेर, वाराणसी, कटरा, सोमनाथ, शिर्डी, अयोध्या, पुरी, तिरुपती, मधुरा, द्वारका, बोध गया, गुरुवायूर आणि मदुराई या १४ शहरांमध्ये किरकोळ क्षेत्रातील कंपन्यांची वाढ झाली आहे, असे अहवाल सांगतो.

हेही वाचा >>>अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

पर्यटकांच्या वाढत्या संख्येनुसार हे मोठे रिटेल ब्रँड मॉल किंवा महत्त्वाच्या ठिकाणी सुरू झाले आहेत. अयोध्येत मान्यवर, रिलायन्स ट्रेंड्स, रेमंड्स, मार्केट ९९, पँटालून्स, डॉमिनोज् , पिझ्झा हट आणि रिलायन्स स्मार्ट यांची किरकोळ विक्रीची दुकाने उघडली आहेत. वाराणसीत मान्यवर, रिलायन्स, ट्रेंड्स, झुडिओ,  शॉपर्स स्टॉप, बर्गर किंग,   क्रोमा  या कंपन्यांनी दुकाने उघडली आहेत.

भारतात आध्यात्मिक पर्यटनात वाढ होत असल्याने किरकोळ क्षेत्रातील सेवा देणारे ब्रँडनी  आध्यात्मिक पर्यटनाच्या शहरांमध्ये पाय रोवायला सुरुवात केल्याचे सीबीआरईचा अहवाल सांगतो.

भारतातील आध्यात्मिक पर्यटनाचा वेगवान विस्तार देशाच्या ‘विश्वासावर आधारित पर्यटन बाजार’च्या वाढीला चालना देत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांना जोडण्याचे सरकारी प्रयत्न देखील या विकासाला प्रोत्साहन देत आहेत. आस्था किंवा भक्तीवर आधारित उत्पादने आणि सेवा देणाऱ्या ऑनलाइन किरकोळ व्यासपीठाचा उदयही यामागील प्रमुख कारण आहे.- अंशुमन मॅगझिन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सीबीआरई