पीटीआय, कोलकाता पश्चिम बंगालमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या हिंसाचारग्रस्त गावामध्ये सरकारतर्फे उभारण्यात आलेल्या शिबिरांमध्ये एक हजार २५०पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी साधारण ४०० तक्रारी जमिनीच्या वादासंबंधी आहेत. स्थानिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रशासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली आहे.स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे जमिनींवरील अतिक्रमण आणि लैंगिक अत्याचारांविरोधात करण्यात आलेल्या हिंसक निदर्शनांच्या केंद्रस्थानी असलेल्या संदेशखाली मंडल २ येथे सर्वाधिक म्हणजे जवळपास एक हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचे मंत्री सुजीत बोस आणि पार्थ भौमिक यांनी शनिवारी संदेशखालीला जाऊन तेथील पाहणी केली. तर माकपच्या नेत्या मीनाक्षी मुखोपाध्याय यांना संदेशखालीला जाण्यापासून अडवण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकानेही सलग दुसऱ्या दिवशी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी संदेशखालीची तुलना २००७-०८मधील नंदीग्रामच्या परिस्थितीशी केली.