इंडोनेशियाच्या सीमेला लागून असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या २०००च्या वर गेली आहे. शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली आलेल्या मलब्याखाली शेकडो घरं जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातील संयुक्त राष्ट्राकडून रविवारी मृतांची संख्या ६७० देण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर सेंटरनं यूएनला लिहिलेल्या पत्रामध्ये ही संख्या २००० च्या वर गेल्याचं नमूद केलं आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी यांबलीमधल्या शेकडो घरांव बाजूच्या डोंगराचा एक मोठा हिस्सा कोसळला. या भागात जवळपास ४ हजार नागरिक राहात होते, अशी माहिती पापुआ न्यू गिनीमध्ये आणीबाणीच्या स्थितीत बचावाची जबाबदारी असणाऱ्या CARE या संस्थेचे संचालक मॅकमोहन यांनी माध्यमांना दिली.

मात्र, असं असताना नेमकी किती लोकसंख्या दरडीखाली दबलेल्या गावात राहात होती, याचा अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पापुआ न्यू गिनीची शेवटची जनगणना २००० साली पार पडली होती. त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार या गावाची सांगण्यात आलेली लोकसंख्या नंतरच्या काळात बरीच वाढली असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू वर्षात देशात जनगणना केली जाणार असल्याचं पापुआ न्यू गिनी सरकारनं जाहीर केलं आहे.

भौगोलिक स्थितीमुळे बचावकार्यात अडथळे

दरम्यान, या भागातील भौगोलिक स्थितीमुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. या भागातील भौगोलिक रचनेत वारंवार बदल होत असून दुर्गम भागामुळे स्थिती अधिक गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे बचावकार्यासाठीचं पथक इथे पोहोचण्यास घटनेनंतर दोन दिवस लागले, असं घटनास्थळी दाखल झालेल्या यूएनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. यादरम्यान स्थानिकांनी हाती मिळेल त्या साहित्याच्या सहाय्याने लोकांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, घटनास्थळी जवळपास २७ फूट मलबा जमा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील बचावकार्य काही दिवस चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक आदिवासी समूहाकडून अडथळे

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या पथकांकडून स्थानिक आदिवासी समूहाकडून बचावकार्यात अडथळे आणले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या आदिवासी गटांमध्ये आपापसांत होणाऱ्या हिंसक घटनांमुळे बचावपथक व बचावसाहित्य घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे या साहित्याला पूर्ण मार्गावर लष्करी सुरक्षेत ने-आण करावी लागत आहे, असंही यूएनच्या पथकांकडून सांगण्यात येत आहे.