तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. गुरूवारी रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. यापूर्वी सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. A political party will be launched in January; Announcement regarding it will be made on December 31st, tweets actor Rajinikanth pic.twitter.com/K2MikOk30I — ANI (@ANI) December 3, 2020 रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांच्या नावे असणारं एक पत्र तामिळनाडूत चर्चेचा विषय ठरलं होतं, यामध्ये डॉक्टरांनी करोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस तसंच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता. रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा आहे.