पीटीआय, भोपाळ / जयपूर : काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. तसेच महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला पाठिंबा हा अपरिहार्यतेमुळे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणुका होऊ घातलेल्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनाला संबोधित केले. ‘‘सर्वात आधी (निवडणुकांमध्ये) काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे ‘कंत्राट’ शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता त्यांच्याकडून काँग्रेसची धोरणे आणि घोषणा तयार केल्या जातात, नेत्यांकडून नव्हे,’’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी तोफ डागली. शहरी नक्षल्यांकडे असलेला पक्षाचा ताबा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाणवत असल्यामुळेच त्यांची अवस्था दोलायमान झाली आहे, असा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस सत्तेत आल्यास संसाधनांच्या दृष्टीने सधन असलेल्या मध्य प्रदेशला पुन्हा ‘बिमारू राज्यां’च्या यादीमध्ये लोटेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस नकारात्मकता पसरवीत आहे. देशाच्या उपलब्धी त्यांना आवडत नाहीत. त्यांना देशाला पुन्हा २०व्या शतकात घेऊन जायचे आहे, असा आरोपही मोदी यांनी केला. जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात पक्षाच्या ‘जन आशीर्वाद यात्रां’चा समारोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान, निवडणूक तोंडावर आलेल्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भाजपच्या सभेत त्यांनी अशोक गेहलोत सरकारवर तोफ डागली. राज्यातील तरुणांची अत्यंत महत्त्वाची पाच वर्षे गेहलोत सरकारने वाया घालविली असून त्यांना शून्य गुण दिले पाहिजेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली. भरती परीक्षा प्रक्रियेमध्ये माफियांचा शिरकाव झाला असून भाजप सत्तेत आल्यानंतर या माफियांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

तातडीने अंमलबजावणी करा – काँग्रेस

जयपूर : महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करा, अशी मागणी काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी केली. विधेयक लागू करण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ फेररचनेची अट काढून टाकण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न असताना काँग्रेसने २१ शहरांमध्ये २१ पत्रकार परिषदा घेऊन याबाबत पक्षाची भूमिका मांडण्याचे निश्चित केले आहे. जयपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत २०२४च्या लोकसभा निवडणुकीपासूनच महिला आरक्षण लागू करावे, अशी मागणी लांबा यांनी केली.

‘महिला आरक्षणाला बळजबरीने पाठिंबा’

काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांना नारीशक्तीची ताकद माहिती असल्यामुळेच महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी ‘अनिच्छेने’ पाठिंबा दिला, अशी टीका पंतप्रधानांनी केली. संधी मिळाली तर ते कायदा मागे घेतील, असा आरोपही त्यांनी केला. विधेयक मंजूर झाले ते मोदी है तो मुमकिन है, यामुळेच.. मोदी म्हणजे आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन, असा दावाही त्यांनी भोपाळमधील भाषणात केला. काँग्रेस व सहकाऱ्यांनी महिला आरक्षण विधेयक ३० वर्षे अडवून धरले. अनेक दशके बहुमतातील सरकार असताना विधेयक का मंजूर करून घेतले नाही, असा सवालही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban naxalites take control of congress criticism of prime minister narendra modi ysh