शरद पवार यांची टीका

कांदा, द्राक्ष, ऊस, दुधासह कृषिमालास भाव नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत असून ते संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी ज्या भाजप सरकारवर आहे, त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गुरूवारी सय्यद पिंप्री येथे आयोजित जाहीर सभेत त्यांचे भाषण झाले. रणरणत्या उन्हात भरदुपारी झालेल्या सभेत मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात कांद्यासह शेतमालास भाव मिळत होता, असे सांगितले. आता परिस्थिती उलट झाली आहे. शेतमालाच्या निर्णयाची वेळ जेव्हां आली, तेव्हां यामागील अर्थनीती आपणास नाशिककडून मिळाली. भाजप सरकारने केवळ कृषिमाल खाणाऱ्यांचा विचार केला. तो पिकविणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. दोन्ही सरकारांच्या कामांतील फरक पवार यांनी मांडला. मोदी सरकार बोलते खूप, काम करत नाही. म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या असून हा चिंतेचा विषय आहे. पुलवामा हल्ला झाल्यावर  सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. नंतर सैन्य दलाने कारवाई केली. कारवाई लष्कराने केली आणि छाती मोदी यांनी फुगविली, असा टोला त्यांनी लगावला. या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलातील वैमानिकाला जगातील अनेक देशांनी टाकलेल्या दबावामुळे  पाकिस्तानातून सोडवून आणण्यात यश आले. स्वत:ची छाती फुगवून घेणारे मोदी कुलभूषणला का सोडवू शकले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. जवान शहीद होतात. त्याचा काही पक्ष राजकीय फायदा घेतात, असा शहीद जवान-अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा आरोप असल्याचे पवार यांनी सांगितले. पाच वर्षांत नाशिकचा विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारच्या कर्जमाफीतील सावळागोंधळ कथन केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजीमंत्री विनायकदादा पाटील, शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

‘मोदींना कुटुंब व्यवस्था कळत नाही..’

मोदी आपल्यावर टीका करतात. पुतण्या पक्ष ताब्यात घेतो असे म्हणतात. परंतु, राजकीय पक्ष एकटय़ाचा नसतो, कार्यकर्त्यांचा असतो. मोदींचे घर नाही. कुटुंब नाही. त्यामुळे त्यांना कुटुंब व्यवस्था कळत नसल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला. देशाची निवडणूक असतांना मोदींना माझ्या कुटुंबाची काळजी आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी त्याग केला आणि मोदी म्हणतात त्यांनी काही केले नाही. मोदींनी पाच वर्षांत काहीच केले नाही म्हणून कुटुंबावर वैयक्तिक टीका करण्यात ते धन्यता मानत असल्याचे पवार यांनी सांगितले.