“मी थेट तुरुंगातून आलोय. आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती. पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. आमचेच उदाहरण घ्या. दिल्ली विधानसभेच्या २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६० हून अधिक जागा मिळाल्या. आम्हाला पराभूत करता येत नाही, म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटले. पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखविले. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू”, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील सभेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधान मोदींचं तिथल्या तिथे उत्तर; मुंबईतल्या सभेत नेमकं काय घडलं?

तुरुंगात माझा घातपात करण्याचा डाव

मुंबईमध्ये २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीकास्र सोडले. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, मी दिल्लीत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात गरीबांना न्याय देणारे काम केले, म्हणून तुरुंगात टाकले. मी दिल्लीतील लोकांना मोफत औषधे दिली. पण जेव्हा मी तिहार तुरुंगात होतो, तेव्हा मला इन्सुलिन मिळू दिले नाही. माझी साखरेची पातळी प्रचंड वाढली. माझ्याबरोबर त्यांना काय करायचे होते? याची मला कल्पना नाही. पण इतिहासात अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्यात आल्या होत्या.

कमळाचे बटन दाबाल, तर मी तुरुंगात

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, २ जून रोजी मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार, असे सत्ताधारी सांगत आहेत. पण माझे मतदारांना आवाहन आहे. तुम्ही जर इंडिया आघाडीला विजयी केले. आमचे सरकार बनविले, तर मला तुरुंगात जावे लागणार नाही. पण तुम्ही कमळाचे बटन दाबले तर मला तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं मी तुरुंगात जावं, त्यांनी कमळाचे बटन दाबावे. ज्यांना वाटते मी स्वतंत्र राहावे, त्यांनी इंडिया आघाडीला जिंकून द्यावे.

मुंबईतल्या सभेतून मोदींचं शरद पवारांना आव्हान, सावरकरांचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींना…”

देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवले

पंतप्रधान मोदी एका गूप्त मोहिमेवर काम करत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. “एक देश, एक नेता”, ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांनाही संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

मोदींना हटविल्याशिवाय हा ‘भटकता आत्मा’ स्वस्थ बसणार नाही! शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

मोदीजी भारताचा पाकिस्तान, बांगलादेश करू इच्छितात

रशियामध्ये पुतिन यांनी सर्व विरोधकांचा नायनाट करून निवडणूक घेतली. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी विरोधकांना तुरुंगात टाकले आणि निवडणूक जिंकल्या. पाकिस्तानमध्येही इम्रान खान यांना तुरुंगात टाकले. पंतप्रधान मोदी हे त्याचप्रमाणे विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन निवडणूक लढवावी. विरोधकांना तुरुंगात टाकून, आमचे अकाऊंट गोठवून निवडणूक कसली लढता? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp eliminated devendra fadnavis now the next number arvind kejriwal big claims kvg