बोईसरमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांनी सगळ्यांनी सभा संपल्यानंतर बोईसर ते वांद्रे असा ट्रेनने प्रवास केला. याचे फोटोही चर्चेत आले आहेत.

नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता. पीएम मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी ट्रेनने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ANI ने वृत्त दिलं आहे.

गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत

“गद्दारांचे दोन मालक सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत. मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते, मी यापुढे देशाच्या पंतप्रधानांवर टीका करणार नाही, तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार आहे. ज्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केली, त्या शिवसेनेला महाराष्ट्रात येऊन तुम्ही नकली म्हणता? पण नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

हे पण वाचा- “महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक..”, उद्धव ठाकरेंची मोदी-अमित शाह यांच्यावर बोईसरच्या सभेत टीका

भारतीय जनता पक्ष हा भेकडांचा पक्ष

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले.

ही सभा संपल्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर ते वांद्रे असा प्रवास केला.