एकनाथ शिंदे कसले शिवसैनिक? यांच्यासारखा डरपोक शिवसैनिक मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, “ते अटकेच्या भितीने भाजपाबरोबर पळून गेले.” शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे (विद्यमान खासदार) यांच्या प्रचारार्थ शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी शिवसेना फुटण्यापूर्वी त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेलं संभाषण सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हाचा प्रसंग संजय राऊत यांनी सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्वजण १५ जून २०२२ रोजी अयोध्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा राजन विचारे, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, शिवसेनेचे आमदार, खासदार आमच्याबरोबर होते. आम्ही अयोध्या दौऱ्यावर असताना १४ जूनच्या रात्री हे महाशय (एकनाथ शिंदे) माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, “आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे”. त्यावर मी त्यांना विचारलं, “काय निर्णय घ्यायचा?” तर ते मला म्हणाले, “हे काही माझं तुरुंगात जायचं वय नाही.” मी त्यांना विचारलं, “तुम्हाला तुरुंगात कोण टाकतंय?” तर ते मला म्हणाले, “मला भीती वाटते, मी तुरुंगात जाऊ शकत नाही”. आमचा हा संवाद अयोध्येत रामाच्या साक्षीने चालला होता. ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हे महाशय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर गेले होते, त्या श्रीरामाच्या साक्षीने हा संवाद चालू होता.

संजय राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे मला म्हणाले, “तुम्ही काहीतरी करा…” त्यावर मी त्यांना विचारलं, “काय करायचं?” तर ते मला म्हणाले, “आपण मोदींबरोबर जायला पाहिजे”. मी त्यांना म्हटलं, “मोदींबरोबर का जायचं? इथे आपलं सगळं चांगलं चाललंय. आपल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार उत्तमपणे चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यकारभाराने गती पकडली आहे आणि तुम्ही म्हणताय हा निर्णय बदलायला हवा, कशासाठी बदलायचा?” त्यावर ते मला एवढंच म्हणाले, माझी तुरुंगात जायची इच्छा नाही.

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “मी त्यांना (एकनाथ शिंदे) विचारलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवतंय? तुम्ही या राष्ट्रासाठी असं काय क्रांतिकारक काम केलं आहे? शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं असं काय कार्य केलं आहे? तुम्ही असं कोणतं भूमिगत कार्य केलं आहे की ज्यामुळे या देशाची सत्ता तुम्हाला तुरुंगात पाठवायला निघाली आहे?” त्यावर ते मला म्हणाले, “माझ्या मागे ईडी आणि सीबीआयवाले लागले आहेत”. मी त्यांना लगेच म्हटलं, “ईडी आणि सीबीआयवाले उगाच कोणाच्या मागे लागत नाहीत. ते माझ्याही मागे लागले होते, मात्र त्यांना मला सोडावं लागलं. त्यांना वाटलं, याला जास्त दिवस डांबून ठेवलं तर हा भिंती फोडून बाहेर येईल. त्यामुळे तुम्हाला कशाला फोन पकडतंय.” त्यावर ते मला म्हणाले, ‘आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, मी काही तुरुंगात जाणार नाही.” याचा अर्थ हे महाशय घाबरून पळून गेले आहेत. म्हणजेच यांच्याकडे निष्ठा, नैतिकता, विचार असं काहीच नाही.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

बाळासाहेबांना तोंड कसं दाखवणार? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना प्रश्न

राऊत म्हणाले, शिवसेनेच्या नावावर यांनी वाममार्गाने कोट्यवधी रुपये कमावले आणि त्या लुटीला संरक्षण मिळावं म्हणून यांनी मोदींचा मार्ग स्वीकारला. ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. जाताना शिवसेनेच्या ४० लोकांना बरोबर घेऊन गेले. मला आता त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं केल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांना तोंड कसं दाखवणार? बाळासाहेबांचं राहू द्या, आनंद दिघे यांना तरी तोंड दाखवू शकता का? त्यांच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक व्हायची तुमची लायकी नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says eknath shinde told me he dont want to go in jail asc