जगभरात हजारोंचा बळी घेऊन आर्थिक संकट निर्माण करणाऱ्या करोना विषाणूची चिंता भारतालाही तीव्रतेने भेडसावण्याचे संकेत आहेत. देशात सहा जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून, संशयितांची संख्याही वाढली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने चार देशांच्या नागरिकांचा व्हिसा तूर्त रोखला आहे. मात्र भारतामध्ये करोनाचे संक्षयित रुग्ण आढळण्याआधीपासूनच अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून फिरताना दिसत आहेत. पण करोना नक्की आहे काय? तो होतो कसा? त्याची लक्षणे काय? मास्क घालून फिरणे गरजेचे आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामान्यांना ठाऊक नसतात. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा केलेला हा प्रयत्न…

करोना नक्की आहे काय?

करोना विषाणू म्हणजे काय आणि त्यावरील उपायांची माहिती देणारे चुकीचे संदेश समाजमाध्यमांमधून पसरत आहेत. तेव्हा याबाबत घाबरून न जाता योग्य माहिती समजून घेणे गरजेचे आहे. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

या आजाराची लक्षणे काय?

मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.

धोकादायक आहे का?

श्वसनाशी निगडित संसर्गाप्रमाणे करोनाची लक्षणे आहेत. याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ  शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असते.  ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.

ही काळजी घ्या

> श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे

> हात वारंवार धुणे

> शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे

>अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ  नये

>फळे, भाज्या न धुता खाऊ  नये

कोणी विशेष काळजी घ्यावी?

> श्वसनाचा त्रास असणारे.

> वरील लक्षणे कोणत्या आजारामुळे आहेत हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशातून प्रवास केला असल्यास.

> प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि बाधित देशात नुकताच प्रवास केला असल्यास अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

यावर औषध आहे का?

करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या तरी औषध उपलब्ध नाही. रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधे दिली जात आहेत. रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यरत असल्यास अन्य इन्फ्लुएन्झाप्रमाणे या विषाणूशी शरीर योग्य रीतीने सामना करते आणि रुग्ण बरा होतो. केरळमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून ती सुधारत असल्याचे डॉ. आवटे सांगतात.

आजार पसरतो कसा?

करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणीजगतात आहे. यापूर्वी चीन आणि सौदी अरेबियामध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू प्राण्यांमधून माणसामध्ये पसरल्याचे आढळले आहे. मात्र प्राण्यांमध्ये आढळणारे इतर प्रकारचे करोना विषाणू अद्याप तरी माणसामध्ये पसरलेले नाहीत. नोवेल करोना विषाणूचा स्रोत अजून तरी सापडलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की कोणत्याही प्राण्यापासून किंवा पाळीव प्राण्यापासून याची तुम्हाला बाधा होईल. रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे चीनमध्ये आढळून आले आहे. या विषाणूचा प्रसार सर्वसाधारणपणे हवेतून शिंकण्या, खोकल्यावाटे पसरत असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाले आहे.  चीन किंवा अन्य बाधित देशातून आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा होण्याचा संभव असला तरी होईलच असे नाही. त्यामुळे या व्यक्तींना कामावर रुजू करून न घेणे वेगळी वागणूक देणे योग्य नाही, असे डॉक्टर प्रदीप आवटे सांगतात.

मास्क वापरणे गरजेचे आहे का?

कोरोनाची भीती वाढल्याने जिकडेतिकडे व्यक्ती मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही व्यक्ती तर एन९५ प्रकारचे मास्क वापरतानाही आढळले आहेत. तेव्हा मास्कचा वापर करणे योग्य आहे का याबाबत डॉ. प्रदीप आवटे सांगतात, सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे असल्यास तुमच्या शिंकण्या किंवा खोकल्यावाटे विषाणू पसरू नयेत म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु मास्क वापरण्यापेक्षाही त्यांची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे आवश्यक असते. वापरलेले मास्क असेच कचरापेटीत टाकल्यास कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांच्या हाताला लागून त्यांना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे खरंतर या व्यक्तींनी मास्कपेक्षा साधा रुमाल नाकाला बांधला आणि वापरल्यानंतर स्वच्छ गरम पाण्यात धुतला तर योग्य आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी मात्र मास्क वापरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. एन ९५ मास्क हे केवळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींनी वापरावेत. विषाणूबाधित व्यक्तींच्या संपर्कात अधिक काळ असल्याने त्यांच्यासाठीही हे मास्क आहेत.

दक्षता घेणे गरजेचे

या आजाराचा बाऊ   करण्यापेक्षा योग्य माहिती समजून याबाबत गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. भीतीने प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे याची भीती बाळगण्यापेक्षा दक्षता घेणे गरजेचे आहे. यासोबतच आपली प्रतिकारशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यशील राहण्यासाठी सकस आहार घेणेही महत्त्वाचे आहे.

उपचाराच्या काय सुविधा आहेत?

चीनमधून आलेल्या प्रवाशांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवले जाते. तपासण्या निगेटिव्ह आढळल्यानंतर आणि १४ दिवसांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यास त्यांना घरी सोडले जाते. चीन व्यतिरिक्त करोनाचे रुग्ण आढळलेल्या १२ देशांमधून प्रवासी भारतात आल्यास आणि करोनाची संभाव्य लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसासाठी ठेवले जाते. तपासण्या निगेटिव्ह आलेल्या आणि घरी सोडलेल्या प्रवाशांची स्थानिक आरोग्य अधिकारयामार्फत २१ दिवस दररोज पाठपुरावा केला जातो. जेणेकरून १४ दिवसानंतर कोणत्या प्रवाशाला लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार केले जावेत.

तपासण्या आणि विलीगिकरण कक्ष कुठे आहेत?

राज्यात मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेमध्ये करोनाची तपासणी केली जाते. तसेच कस्तुरबा रुग्णालयासह पुण्यातील नायडू आणि राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विलीगीकरण कक्ष कार्यरत आहेत.

माहिती संकलन – शैलजा तिवल