ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नुकतीच मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार, ४ जुलैला ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूक होईल. त्यासाठी सहा आठवड्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्ष १४ वर्षांनंतर पराभूत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आताच निवडणुकीची घोषणा का?

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर युरोपप्रमाणेच ब्रिटनच्याही अर्थव्यवस्थेला झळ बसली. ब्रिटनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सध्या तो देश राहणीमानाच्या खर्चाच्या संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थिती लवकर निवडणूक घेण्याची घोषणा करून, सुनक देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि केवळ आपलाच पक्ष देशाला स्थैर्य देऊ शकतो हा संदेश देऊ पाहत आहेत. विद्यमान संसदेचा कार्यकाळ २८ जानेवारी २०२५पर्यंत आहे. पार्लमेंटच्या निवडणुका शरद ऋतूमध्ये, म्हणजे साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होतील असा अनेक निरीक्षकांचा अंदाज होता. मात्र, तेथील स्थानिक निवडणुकांमध्ये झालेल्या घसरगुंडीनंतर, तोपर्यंत हुजूर पक्षाची परिस्थिती फारशी सुधारेल अशी सुनक यांची अपेक्षा नसावी. त्यामुळे अचानक निवडणुका घोषित करून विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाच्या वाटचालीत अडथळा आणता येईल असे त्यांना वाटले असावे असे ब्रिटनच्या राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा >>>नोटाला उमेदवार मानले जाते का? त्याबाबत दाखल नवीन याचिका काय आहे?

पुढे काय?

ब्रिटनची पार्लमेंट बरखास्त करण्याचा निर्णय पंतप्रधानांचा असला तरी नियमाप्रमाणे तो औपचारिक अधिकार तेथील राजाला असतो. त्याप्रमाणे सुनक यांनी राजे चार्ल्स यांच्याकडून त्यासाठी परवानगी मिळवली आहे. या निर्णयानुसार, सध्याच्या पार्लमेंटचा कार्यकाळ ३० मे रोजी संपुष्टात येईल. यादरम्यान नवीन प्रशासन (मंत्रिमंडळ) अस्तित्वात येईपर्यंत सध्याचे मंत्री आपापल्या पदावर कायम राहतील आणि त्यांचे कर्तव्य बजावतील.

सुनक हरण्याची शक्यता आहे का?

ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांचे निकाल पाहिले तर ऋषी सुनक यांचा पराभव अटळ आहे. गेल्या काही महिन्यांपासून मजूर पक्षाने हुजूर पक्षावर लक्षणीय आघाडी घेतली आहे. बहुसंख्य तज्ज्ञांच्या मते, संसदीय निवडणुकांमध्ये मजूर पक्षाला आरामात विजय मिळेल. मात्र, प्रचारानंतर जनमतामध्ये फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, २०१७मध्ये, हुजूर पक्षाचेच सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी जनमत चाचण्यांवर विसंबून राहून निवडणुकांची घोषणा केली. मात्र, त्यांचा प्रचार अतिशय वाईट झाला आणि त्यांनी बहुमत गमावले. त्यांना उत्तर आयर्लंडच्या डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पार्टी (डीयूपी) या पक्षाबरोबर आघाडी करून सरकार स्थापन करावे लागले होते.

हेही वाचा >>>“‘कर्तारपूर’ १९७१ मध्येच भारतात आला असता”; मोदींच्या दाव्यातील गुरुद्वाराचा काय आहे इतिहास?

निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे?

ब्रिटनसाठी आर्थिक स्थैर्य हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सत्ताधारी हुजूर आणि विरोधातील मजूर हे दोन्ही पक्ष आपले सरकार ब्रिटनला आर्थिक स्थैर्य मिळवून देईल असा दावा करत आहेत. मात्र, हुजूर पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांची बाजू काहीशी दुबळी आहे. सुनक यांच्यापूर्वी पंतप्रधान असलेल्या लिझ ट्रस यांच्या काळात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गोंधळाची स्थिती होती. त्याकडे बोट दाखवताना मजूर पक्षाने ‘बदल’ ही घोषणा दिली आहे. मजूर पक्षाने नॅशनल हेल्थ सर्व्हिससारख्या सार्वजनिक सेवांवर लक्ष केंद्रित केले आहे. ब्रिटिश जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असेलली ही योजना सध्या अपुऱ्या निधीमुळे तितकीशी कार्यक्षम राहिलेली नाही आणि रुग्णांना उपचारासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. आर्थिक मुद्द्यालाच जोडून स्थलांतरितांचा प्रश्नही ब्रिटिश जनतेसाठी महत्त्वाचा आहे. स्थलांतरितांना घेऊन येणाऱ्या बोटी थांबवण्याचे सुनक यांनी वारंवार आश्वासन दिले आहे. मात्र, बेकायदा मार्गाने आलेल्या स्थलांतरितांना रवांडामध्ये परत पाठवण्याचा उपाय खर्चिक आणि अव्यवहार्य असल्याचे मजूर पक्षाचे म्हणणे आहे.

इतर पक्षांची कामगिरी कशी असेल?

लिबरल डेमोक्रॅट्स हा पक्ष २०१०-१५ या काळात हुजूर पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी झाला होता. आता मात्र तो हुजूर पक्षाच्या विरोधात आहे. दक्षिण ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाला आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ग्रीन पार्टी या पक्षाचा पार्लमेंटमध्ये एकच सदस्य आहे. त्यांना ब्रिस्टलच्या आणखी एका जागेवर विजय मिळण्याची आशा आहे. स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम चालवणारा स्कॉटिश नॅशनल पार्टी हा पक्ष विद्यमान संसदेत ४३ सदस्यसंख्येसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, त्यांच्या पक्षाच्या हमजा युसूफ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील काही जागा जिंकण्यासाठी मजूर पक्ष प्रयत्नशील असेल.

प्रचार कसा होतो?

विविध वाहिन्या, डिजिटल व्यासपीठे आणि रेडिओ या माध्यमांमधून नेहमीप्रमाणे जोरदार प्रचार केला जाईल. त्यामध्ये पक्षांचे जाहीरनामे, अनेक कार्यक्रमांच्या योजना, नेत्यांदरम्यान वादविवाद यांचा समावेश असेल. त्याच्या जोडीला संसदेचे ६५० सदस्य स्थानिक पातळीवरील मुद्देही विचारात घेऊन प्रचार करतील. त्यामध्ये घरोघरी जाणे, पत्रके वाटणे आणि स्थानिक मतदारांशी संवाद साधणे ही पारंपरिक पद्धत वापरली जाते.

निवडणूक कशी होते?

मतदानाची वेळ सकाळी सात ते रात्री दहा अशी असेल. पारंपरिक पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान केले जाते. त्यासाठी मतदार पेन्सिलीने आपल्या पसंतीच्या उमेदवारावर खूण करतात आणि प्लास्टिकच्या मतपेटीत मतपत्रिका टाकतात. मतदान संपल्यांतर एक्झिट पोल प्रसिद्ध केले जातात. बहुतांश वेळा हे पोल अचूक निकाल दर्शवतात. मतमोजणी रात्रीच सुरू होते आणि काही मतदारसंघांमध्ये रात्रीच विजयी उमेदवाराची घोषणा होते. सकाळपर्यंत विजेता कोण याचा अंदाज आलेला असतो. बहुमतासाठी ३२६ मतदारसंघांमध्ये विजयाची आवश्यकता असते. सभागृह त्रिशंकू झाल्यास विद्यमान पंतप्रधान पदावर राहतात आणि त्यांना सरकार स्थापनेची पहिली संधी दिली जाते.

सुनक खासदार राहतील का?

सुनक यांनी मागील आठवड्यात एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात याचे उत्तर सकारात्मक दिले होते. रिचमंड हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि तेथील यॉर्कशायर काउंटीमधील घर आपल्याला प्रिय असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला आवडेल असे त्यांनी सांगितले आहे.

nima.patil@expressindia.com