शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही,’ असे अजित पवार म्हणाले होते. आता सरकार आले आहे. मग सातबारा कोरा झाला काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे उपस्थित केला. कर्जमाफी करण्यासाठी पैसे नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये मेळाव्याचे सायंकाळी आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील होते.

भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ८ जानेवारीला देशभर बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून या दिवशी शेतकऱ्यांची काय ताकद आहे, हे सरकारला समजेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यात नवे पदाधिकारी

दरम्यान, आज स्वाभिमानी संघटना व पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. ताज्या दमाच्या तरुण रक्ताला वाव देण्याचे धोरण दिसून आले. त्यामध्ये स्वाभिमानी पक्ष – जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, हातकणंगले, स्वाभिमानी संघटना जिल्हा अध्यक्ष – जनार्दन पाटील,करवीर, कार्याध्यक्ष – रमेश भोजकर, हातकणंगले युवा आघाडी – सागर शंभूशेटे, अजित पवार .

शिवथाळी कोठून आणणार?

राज्य शासनाच्या शिवथाळीबाबत शेट्टी म्हणाले,  शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे प्रथम बघा. शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडले तर शिवथाळीमध्ये आणणार कोठून? परवडत नाही म्हणून पिकवले नाही तर शेवटी आयातच करावे  लागेल, अशा शब्दात शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.