सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा

, थिम्पू (भूतान) : सॅफ स्पर्धेअंतर्गत बुधवारी झालेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल सामन्यात भारताने श्रीलंकेचा १२-० असा दणदणीत पराभव केला. चांगलीमिठांग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय मुलींनी प्रारंभापासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पूर्वार्धात भारतीय कन्यांनी तब्बल ६ गोल झळकावत घेतलेली आघाडी उत्तरार्धातदेखील तितकेच गोल झळकावून कायम राखली. भारताकडून शिलकीदेवी हिने पहिले मिनिट, २०आणि ४४ मिनिटे अशा वेळी तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली. तर तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. त्यात अविका सिंग, सुनीता मुंडा आणि अंजू यांचा समावेश आहे, तर लिंडा कोम, क्रिटीनादेवी आणि किरण यांनी प्रत्येकी एक गोल करीत विजयात महत्त्वाचे योगदान दिले.