चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाच्या सहभागाविषयी अखेर संभ्रमाचे ढग दूर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्याची निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) नव्या अर्थरचनेचा आराखडा मंजूर करताना भारताची मक्तेदारीला आव्हान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी बीसीसीआयने केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याचा इशारा बीसीसीआयने दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी बीसीसीआय विशेष सर्वसाधारण बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत बहुमताने भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार असा निर्णय घेण्यात आला. आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवणार नाही. पण अमिताभ चौधरी आणि सीईओ राहुल जोहरी यासंदर्भात आयसीसीशी चर्चा करतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला अशी माहिती बैठकीत उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सी के खन्ना, अमिताभ चौधरी, राजीव शुक्ला आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याती अंतिम तारिख २५ एप्रिल होती. पण बीसीसीआय आणि आयसीसीतील मतभेदामुळे भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी ८ मे रोजी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले होते.