सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. १९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने नावाप्रमाणेच ‘गब्बर’ खेळी करत ५० चेंडूत ७८ धावा कुटल्या. धवनच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शिखर धवन पायचीत झाला. थोड्यावेळाने धवन नाबाद असल्याचं निष्पन्न झालं. पण पंचांनी धवनला बाद ठरवलं होतं आणि धवनही DRSचा पर्याय न घेता निघून गेला होता.

असा झाला धवन पायचीत…

या मुद्द्यावरून युवराजने सामन्यातील पहिला डाव संपल्यावर ट्विट केलं. शेवटच्या २ षटकांत एकही चौकार षटकार न मारू दिल्याबद्दल त्याने संदीप शर्मा आणि टी नटराजनचं कौतुक केलं. तसेच धवनच्या धडाकेबाज खेळीचीही स्तुती केली. त्याचसोबत त्याने DRS घ्यायला विसरलास का? असंही मजेत धवनला विचारलं. त्यावर धवनने मजेशीर रिप्लाय दिला. धवनने लिहिलं की पाजी, मला वाटलं की मी प्लंब आऊट आहे म्हणून मी सरळ तंबूच्या दिशेने चालत गेलो. सीमारेषेपर्यंत पोहोचल्यावर समजलं की मी नाबाद होतो.

दरम्यान, ७८ धावांच्या खेळीसह धवनने IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला.