Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Qualifier 2 Highlights: सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न तोडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला राजस्थानचा संघ यंदाही फेल ठरला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने ३६ धावांनी राजस्थानचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेर केले आहे. यासह हैदराबादचा संघ आय़पीएल २०२४ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. हैदराबादचे फिरकीपटू राजस्थानच्या फलंदाजांवर इतके भारी पडले त्यांना पुनरागमनाची संधीच मिळाली नाही. परिणामी राजस्थानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर संघाचा कर्णधार संजू सॅमसनने संघाने सामना कुठे गमावला हे सांगितलं.

पराभवानंतर बोलताना संजू सॅमसन म्हणाला, “हा एक मोठा सामना होता. पहिल्या डावात गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याचा मला खरोखर अभिमान आहे. हैदराबादच्या फिरकीविरुद्ध मधल्या षटकांमध्ये आम्ही कमी पडलो आणि तिथेच आम्ही खेळ गमावला. दव कधी येईल आणि कधी नसेल यांचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टीमध्ये बदल दिसून आला, चेंडू थोडा टर्न होत होता आणि हैदराबादने याचा खरोखरच चांगला फायदा उचलला.”

हैदराबादच्या फिरकी आक्रमणापुढे संघाच्या फलंदाजांबद्दल बोलताना म्हणाला, “आमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध त्यांनी मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी केली, तिथेच ते आमच्याविरुद्ध वरचढ ठरले. त्यांच्या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीच्या विरोधात, जेव्हा चेंडू थांबून येत होता, तेव्हा आम्ही थोडा अधिक रिव्हर्स-स्वीप खेळण्याचा प्रयत्न करू शकलो असतो किंवा कदाचित क्रीजचा थोडा अधिक वापर करू शकलो असतो. पण त्यांनीही खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”

हेही वाचा – सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीची उत्तुंग भरारी! साराने ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; मास्टर ब्लास्टरची भावुक पोस्ट

राजस्थान रॉयल्स संघाच्या एकूण कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, “आम्ही केवळ या हंगामातच नाही तर गेल्या तीन वर्षांपासून काही काही उत्कृष्ट सामने खेळले आहेत. आमच्या फ्रेंचायझीसाठी ही एक चांगली बाब आहे. राजस्थानने देशासाठी काही प्रतिभावान खेळाडू शोधले आहेत. रियान पराग, ध्रुव जुरेल आणि त्यांच्यापैकी बरेच जण केवळ आरआरसाठीच नव्हे तर निश्चितपणे भारतीय क्रिकेट संघासाठी खरोखरच खेळताना दिसतील. गेले तीन हंगामा आमच्यासाठी खरोखरच चांगले होते.”

पुढे सॅमसन म्हणाला, संदीप शर्मासाठी मी खूप खूश आहे. “लिलावात त्याची निवड नाही केली पण बदली खेळाडू म्हणून तो संघात सामील झाला. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, त्यावरून त्याची प्रतिभा आणि कौशल्य त्याने दाखवून दिलं आहे. संदीप शर्माचे गेल्या दोन वर्षांतील गोलंदाजीचे आकडे पाहता तो बुमराहनंतरचा पुढचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असेल. त्याने उत्तम कामगिरी केली आहे.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, हे ५ खेळाडू पहिल्यांदाच खेळणार विश्वचषक

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७५ धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरूवात केली पण यशस्वीने विकेट गमावल्यानंतर राजस्थानचे फलंदाज झटपट विकेट गमावत पॅव्हेलियनमध्ये परतले. हैदराबादच्या फिरकी आक्रमणापुढे राजस्थानचे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. पण एकट्या ध्रुव जुरेलने शेवटपर्यंत झुंज दिली आणि अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक केले. पण त्याला साथ न मिळाल्याने तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला आणि राजस्थानने ३६ धावांनी सामना गमावला,