मातीतल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्राची मक्तेदारी असली तरी मॅटवर महाराष्ट्राच्या मल्लांना प्रगती साधता येत नाही, अशी एक ओरड सुरू होती. पण या गोष्टींना छेद देत अमोल बराटे या महाराष्ट्राच्या मल्लाने भिवानी (हरयाणा) येथे मॅटवर झालेल्या अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. ८४ ते १२० किलो गटात प्रतिनिधित्व करताना त्याने सर्वच्या सर्व लढतींमध्ये सहज विजय मिळविला. मॅटवर हिंद केसरी किताब मिळविणारा तो पहिलाच महाराष्ट्रीयन मल्ल आहे. यापूर्वी श्रीपती खचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, हजरत पटेल, दीनानाथसिंह, विनोद चौगुले, योगेश दोडके यांनी हिंद केसरी किताब मिळविला आहे, मात्र त्यांनी मातीवरील कुस्तीत हे यश मिळविले होते. अमोल हा गुलसे तालीम सह्य़ाद्री कुस्ती संकुलात विजय जाधव व विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अमोलने भिवानी येथील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविताना महिपाल, अनिलकुमार, मनजीतसिंग व दीपककुमार यांच्यावर मात केली. अंतिम फेरीत त्याच्यापुढे हवाई दलाच्या सोनूकुमारचे आव्हान होते. सुरुवातीपासूनच अमोल याने या कुस्तीत वर्चस्व राखले होते. ही लढत त्याने ६-२ अशा गुणांनी जिंकली. रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे अमोलचे ध्येय आहे. पुढील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करण्यावर तो लक्ष केंद्रित करणार आहे. तो दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी चार तास सराव करीत आहे. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये दोन सुवर्णपदके ‘सेना केसरी’ यांच्यासह अनेक स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. खाशाबांचा वारसा चालवायचा आहे -अमोलमिलिंद ढमढेरे, : भारताला कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे माझ्यासाठी आदर्श कुस्तीपटू असून त्यांचा वारसा चालविण्यासाठी आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे असे ‘हिंद केसरी’ किताब मिळविणारा मल्ल अमोल बराटे याने सांगितले. विजेतेपद मिळविण्याची खात्री होती काय, असे विचारले असता अमोल म्हणाला, मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी कसून सराव करीत असल्यामुळे हिंद केसरी स्पर्धेसाठी वेगळा सराव करण्याची आवश्यकता भासली नाही. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदक मिळविले असल्यामुळे संभाव्य प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीची मला जाणीव होती. हिंद केसरी स्पर्धेसाठी भारत केसरी विजय गावडे व रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे यांनीही मला बहुमोल सूचना केल्या. त्याचा फायदा मला या स्पर्धेसाठी झाला.अंतिम लढतीविषयी कशी तयारी केली होती, या प्रश्नावर अमोल म्हणाला, भिवानी येथील स्पर्धेत सोनूकुमारच्या लढतींचे मी बारकाईने निरीक्षण केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लढताना सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेण्याचे मी ठरविले होते. मी केलेल्या नियोजनानुसारच डावपेच खेळले गेले आणि सुरुवातीला घेतलेली आघाडी मी शेवटपर्यंत टिकविली.