सुधा सिंह, भारताची धावपटू

तुषार वैती

गेल्या दोन वर्षांपासून टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकरिता माझी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताची अ‍ॅथलेटिक्समधील पदकाची पाटी कोरी असली तरी यंदा मात्र तो शिक्का पुसला जाईल. भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक नक्कीच मिळेल, असा विश्वास भारताची धावपटू सुधा सिंह हिने व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुधाला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतरच्या तिच्या भावना तसेच ऑलिम्पिकच्या तयारीविषयी सुधाशी केलेली ही बातचीत-

* पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर काय भावना आहेत?

माझ्यासाठी हा संस्मरणीय दिवस होता. पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर खूप आनंद झाला. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी माझ्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल खूप बरे वाटले. त्यासाठी माझ्या नावाची शिफारस करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारचे मी आभार मानेन. शिफारशीनंतरही मला पुरस्कार मिळेल की नाही, याची खात्री नव्हतीच. अखेर पुरस्कारांची यादी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर कौतुकाचा वर्षांव होत होता. आता पद्मश्री पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी आणखीन वाढली आहे.

* टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी कशी तयारी सुरू आहे?

२०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून आम्ही पतियाळानंतर बेंगळूरु येथील राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी झालो आहोत. करोनामुळे आम्हाला दोन महिने विश्रांती मिळाली, पण त्यानंतर आमची तयारी जोमाने सुरू आहे. क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय अ‍ॅॅथलेटिक्स महासंघाचा चांगला पाठिंबा आम्हाला मिळत आहे. आता ७ मार्च रोजी होणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा माझा मानस आहे. जवळपास वर्षभरानंतर स्पर्धेत उतरणार असल्यामुळे माझ्या कामगिरीनंतर पुढील स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेणार आहे. स्टिपलचेस आणि मॅरेथॉन या दोन प्रकारांकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी किमान एका प्रकारामध्ये टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची माझी इच्छा आहे.

* ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ इच्छिणाऱ्यांना कशी मदत मिळत आहे?

अंजू बॉबी जॉर्जसारखी जागतिक पदक विजेती माजी खेळाडू भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी रुजू झाल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होत आहे. खेळाडूंना काय हवे आहे, याची चांगली जाण खेळाडू या नात्याने अंजूला आहे. त्याचबरोबर महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालयाकडूनही पूर्ण सहकार्य मिळत आहे. पूर्वी खेळाडूंची कामे पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागायचा, पण आता पूर्वीपेक्षा जलद गतीने कामे होताहेत. वरिष्ठ खेळाडूंप्रमाणेच कनिष्ठ खेळाडूंनाही आहार, अन्य भत्ते वेळेवर मिळत आहेत. अन्य देशांमध्ये अशा सोयीसुविधा फार खचितच मिळतात. सर्वाकडून चांगला पाठिंबा मिळत असताना आता देशाचे नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करून देशासाठी पदके आणावीत.

* यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकाची आशा बाळगता येईल का?

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ललिता बाबरने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. यंदा भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये नक्कीच ऑलिम्पिक पदक मिळेल, अशी मला खात्री आहे. स्टिपलचेसपटू अविनाश साबळे तसेच भालाफेकपटू नीरज चोप्रा चांगली कामगिरी करत असून त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येऊ शकते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर देशाला पदक मिळवून देण्याचे माझेही स्वप्न आहे. मात्र सर्व काही सरावावर अवलंबून असणार आहे. त्या दिवसाची कामगिरी पदकासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.