भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने तिसऱ्या निर्णायक सामन्यात शानदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. ऋषभ पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून ‘सामनावीरा’चा पुरस्कार मिळवला. पंतच्या शतकी खेळीनंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे एक ट्वीट व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये युवराज सिंगने पंतच्या शतकी खेळीचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे.

ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना ऋषभ पंतने शतक झळकावले. त्याने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. त्यानंतर लगेचच युवराजने एक ट्वीट केले. या ट्वीटनुसार, शतक झळकावण्यापूर्वी ऋषभ पंत आणि युवराज दरम्यान ४५ मिनिटे म्हणजे पाऊणतास चर्चा झाली होती.

२००२ मध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने नॅटवेस्ट चषकाच्या अंतिम सामन्यात ३२६ धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात युवराज आणि कैप विजयाचे शिल्पकार ठरले होते. त्यानंतर बरोबर २० वर्षांनी ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात तशीच कामगिरी केली आहे. पंत आणि पंड्याने १३३ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.