अमरावती : शिक्षण हे केवळ साक्षरतेसाठी नाही, तर उत्तम नागरिक घडविण्याचे केंद्र असायला हवे, या ध्यासाने अमरावतीत ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ची स्थापना झाली. विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ कृतिशील शिक्षण देणाऱ्या या शाळेने आता ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी संस्थेला दानशूरांकडून मदतीची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबरोबरच त्यांना कर्तव्यशील नागरिक बनविण्याच्या व्यापक भूमिकेतून चालवल्या जाणाऱ्या ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’मधून विद्यार्थी थेट प्रयोगातून, व्यवहारज्ञानातून विविध विषयांचे शिक्षण घेतात. वर्ग, गणवेश, वेळापत्रक यात अडकून न पडता निरीक्षण आणि विचारमंथनातून शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. लोकशाहीवादी मूल्ये बळकट करणाऱ्या या शाळेतून अनेक विद्यार्थी समृद्ध होत आहेत. ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च दिला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील पात्र शंभर विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. इयत्ता नववीचे विद्यार्थी या फलोशिपसाठी परीक्षा देऊ शकतील. लेखी परीक्षा आणि मुलाखत असे या परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. जैवविविधता, निसर्ग-मानवातील परस्परपूरकता, सहिष्णुता, मानवी हक्क, अशा विविध अभ्यास विषयांवर आधारित ही फेलोशिप विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकणार आहे. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक आव्हाने स्वीकारण्यास सक्षम तरुणांची पिढी घडवणे हा उद्देश फेलोशिपमागे आहे. लेखी परीक्षेच्या माध्यमातून २०० विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर या मुलांसाठी दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात त्यांना अभ्यास विषयांच्या माहितीसोबतच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. अनुभवात्मक शिक्षणासोबतच समाजातील समस्यांचे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना घडविण्यात येणार आहे. समाजात, निसर्गात जे प्रश्न दिसतात आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपला सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे समजल्यावर तोडगा काढण्यासाठी आखणी करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे अपेक्षित आहे. सूचना आणि शिफारशींच्या माध्यमातून विविध प्रश्न हाताळतानाच तज्ज्ञ चमूच्या मुलाखतीलाही या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल. त्यातून शंभर विद्यार्थी फेलोशिपसाठी निवडले जातील. फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणासाठी इयत्तेनुसार लागणाऱ्या पुस्तकांचा एक हजार ते पाच हजार रुपयांचा खर्च दिला जाणार आहे. यंदा ही फेलोशिप अमरावती जिल्ह्यापासून सुरू केली जाणार असून पुढल्या वर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती शाळेचे संचालक अतुल गायगोले यांनी दिली.