राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यांची महाविकास आघाडी देखील स्थापन झाली असून लवकरच सत्तास्थापनेची घोषणा होऊ शकते. यापार्श्वभूमीवर राज्यातील या राजकारणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये निवडणूकीनंतरच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

राज्यातील रहिवासी असलेल्या एस. आय. सिंह या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. यात म्हटले की, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना असे आदेश द्यावेत की जनमताविरोधात एकत्र आलेल्या या आघाडीचे सरकार स्थापन करण्यास त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निमंत्रण देऊ नये.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन सहमती न झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्तास्थापनेची तयारी केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमावरही सहमती झाली आहे. त्यामुळे संभाव्य महाविकास आघाडीच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन ही आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.