श्री सदस्यांनीकडून स्वच्छतेचा संदेश गांधी जयंतीचे औचित्य साधुन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अलिबाग तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहीमेत ३ हजार ३१३ श्री सदस्य सहभागी झाले. यावेळी १४८ टन कचरा संकलित करत श्री सदस्यांनी स्वच्छतेकडून समृध्दीकडे असा त्यांनी संदेश दिला. देशभरातील ११ राज्यातील ५३ जिल्ह्यात हि मोहिम राबविण्यात आली. मोहिमे आंतर्गत १५० शहरे आणि गावांची स्वच्छता करण्यात आली. या मोहीमेत जवळपास दिड लाख श्री सदस्य स्वयंप्रेरणेनी सहभागी झाले. ४ हजार ५०० किलो मिटर लांबीचे रस्ते १७ किलो मिटर लांबीचे समुद्र किनारे आणि १२५० कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. अलिबाग शहरात नगरपालिका कार्यालय, समुद्र किनारा, शासकीय कार्यालये, बसस्थानके आणि प्रमुख रस्त्यांची यावेळी साफसफाई करण्यात आली. रस्त्याच्याकडेला उगवलेली रानटी झाडे, वेली दूर करण्यात आली. शहरांतील विवीध भागात पडलेला कचरा, पालापाचोळा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कचरा संकलित करण्यात आला. तब्बल १४८ टन कचरा सदस्यांनी श्रमदानातून संकलित केला. ८५ टेम्पो आणि ९ डंपर यावेळी वापरण्यात आले. सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वछता हा उपक्रम धर्म म्हणून जोपासला पाहिजे. स्वच्छतेचे महत्व सर्वानाच ठाऊक आहे पण सुरुवात कोणी करावयाची हा खरा प्रश्न आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपले घर, आपले गाव आपले शहर कसे स्वच्छ राहिल याकडे सर्वानी लक्ष्य देण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छता हि सामुदायिक जबाबदारी आहे आणि ती सर्वानी पार पाडली पाहीजे, स्वच्छतेबाबत जेव्हा सामाजिक जाणिव निर्माण होईल असा संदेश यावेळी श्री सदस्यांनी यावेळी दिला. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगाराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपप्रक राबविण्यात आला.