शरद पवार आणि जयंत पाटील यांनी माझ्याबाबतीत निर्णय घेतला म्हणून इथं उभा आहे असं म्हणत आपल्या बंडावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्यातील अनेकांनी पक्षाविरोधात काम केलं. अनेकजण पक्ष सोडून गेले. तरीही आपल्या चांगल्या जागा आल्या. आता पक्षांतर करणाऱ्यांना किमान वर्षभर तरी आपल्या पक्षात स्थान देऊ नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांनी जेव्हा स्वतःच्या बंडाबाबत भाष्य केलं तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. मात्र भाजपासोबत जाण्याच्या त्या निर्णयानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं.  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “राज्यातील विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार यांनी जे झंझावाती दौरे केले. त्यातून आघाडीसाठी वातावरण निर्माण झाले. त्याचमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा जिंकण्यास मिळण्यास मदत झाली आहे. मात्र यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून, राज्यात दौरे झाले असते, तर आज आपण बहुमताच्या जवळपास गेलो असतो. अशी भूमिका मांडत, काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी निशाणा साधला.

मी संजय काकडेंना बघायला जाईन, तेव्हा तू सोबत चल : अजित पवार

पुण्यात अजित पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना. एक कार्यकर्ता मध्येच उठून म्हणाला, दादा संजय काकडेंवर बोला, या कार्यकर्त्यांच्या मागणीवर, मी बघायला जाईन तेव्हा तू सोबत चल, माझे दोन डोळे अन तुझे दोन डोळे असे चार डोळे बघतील. असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

मी एवढं सांगतोय म्हटल्यावर, मीच पालकमंत्री होणार

पुण्यात आयोजित मेळाव्यात अजित पवार यांच्या भाषणाच्या दरम्यान अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील समस्या सांगत होत्या. त्या प्रत्येकाला आपण करू, होईल असे अजित पवार सांगत होते. त्याच दरम्यान एक जण म्हटला दादा, हे सगळे प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही पालकमंत्री व्हा, यावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा एवढं सगळं सांगतो म्हणजे, मीच पालकमंत्री होणार आहे. म्हणूनच सांगतोय ना बाबा असे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे.