सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री आपला असताना आपली चार कामं झाली पाहिजेत अशी अपेक्षा असते, पण तसं काही झालंच नाही. दुसऱ्यांची कामं झाली, त्यांचाच पक्ष वाढत होता, आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्याचं आम्ही पाहत होतो अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गुरुवारी रात्री मुंबईतील रवींद्रन नाट्यमंदिरात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी समर्थकांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री या मेळाव्याला हजेरी लावत संबोधित केलं. सरकारमध्ये असतानाही अडीच वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं? अशी विचारणाही एकनाथ शिंदे यांनी केली.

“ज्या घडामोडी घडल्या त्याची जगातल्या ३३ देशांनी दखल घेतली होती. रोज सगळीकडे टीव्हीवर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि ५० माणसं दिसत होती. आधी कमी होते, नंतर वाढत गेले. आता मुंबईत गेल्यावर परत वाढवूया असं म्हटलं. काही लोक जबरदस्ती घेऊन गेले, पळवून नेलं असं म्हणत होते. मग आम्ही तिथे बैठक घ्यायचो, गाणी म्हणायचो, वाढदिवस साजरे करायचो. यानंतर कोणीही तिथे दबावाखाली नाही ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचायची,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“ज्यांना एकनाथ शिंदेंचा फोन आला…”, मंत्रीपदाबाबत बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान!

“जबरदस्ती ठेवलेल्यांची नावं सांगा असं सांगत होतो, पण कोणी सांगितलं नाही. कारण तिथे सगळे आपल्या मर्जीने आले होते. यातना भोगून अस्तित्व धोक्यात आलं होतं म्हणून आले होते. त्यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर होते,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

“आम्ही भाजपासोबत निवडणुका लढल्या होत्या, त्यामुळे गेल्या १५ दिवसात जे झालं ते अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं. आपण चुकीच्या मार्गाने चाललो असल्याचं सर्वांचं म्हणणं होतं. अनेकजण हे घातक असून यात बदल करण्याची मागणी करत होते. सहा महिन्यातच जे सोबत आहेत ते बगलेमध्ये धरुन मुंडी दाबत असल्याचं समजत होतं. त्यांनी संपवण्याचा निर्धार केला असल्याचं लक्षात आलं,” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

“जिथे आपला माणूस निवडून आला आहे तिथे पराभूत उमेदवाराला ताकद देण्याचं काम सुरु झालं होतं. यापुढचा मुख्यमंत्री, आमदार राष्ट्रवादीचा असं बोलू लागले होते. हे सगळं उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहत होतो. आम्ही प्रयत्न करुन पाहिले पण काही झालं नाही,” अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Photos: इंधनदर कपात ते सरपंचाची थेट निवड… शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीमधील आठ महत्त्वाचे निर्णय

“अनेक शिवसैनिकांना खोट्या केसेस, तडीपारीला सामोरं जावं लागलं. तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख माझ्याकडे रडत होते. मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण सरकार, अधिकार असतानाही आम्ही वाचवू शकलो नाही. कशाला हवी आहे अशी सत्ता? सत्तेमध्ये शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे असं बाळासाहेब सांगायचे,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी करुन दिली.

“सभागृहात सावरकरांचा, हिदुत्वाचा अपमान होत असातनाही बोलता येत नव्हतं. आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकावला तेव्हा शेवटच्या कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय झाला,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“भाजपाकडे ११५ आमदार असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे ५० आमदार लढवय्ये आणि शूर असून बाळासाहेबांचे सैनिक आहेत, यांनाच पाठिंबा द्यायचा असं सांगितलं. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला. पंतप्रधान मोदींनी मला पूर्ण भाषण ऐकल्याचं सांगितलं. तुम्ही मनापासून सगळं बोललात असं ते म्हणाले. मीदेखील त्यांना १० टक्के बोललो ९० टक्के अजून पोटात आहे म्हटलं. वेळ आल्यावर बोलणार,” असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.