महाराष्ट्रातील बुलढाणा येथे जन्मलेली साची ही आधार कार्ड मिळवणारी देशातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण जन्माच्या दुसऱ्या मिनिटाला साचीच्या आईवडीलांनी तिचे नाव 'आधार'साठी नोंदवले. आणि लगेचच 'बाल आधार'साठी लागणारी सर्व माहिती घेऊन तिला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) १२ आकड्यांचा 'आधार' क्रमांकही दिला. साचीचे आईवडील मुळचे बुलढाण्यातील खामगावचे आहेत. १८ एप्रिल रोजी साचीचा जन्म झाल्यानंतर १ मिनिट ४८व्या सेकंदाला त्यांनी तिचे नाव 'आधार'कार्डसाठी नोंदवले. मुलीच्या जन्माच्या आनंदाबरोबर आपली मुलगी 'बाल आधार'कार्ड असणारी सर्वात तरुण भारतीय ठरल्याचा विशेष आनंद असल्याचे साचीच्या वडिलांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले. सामान्यांना आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमॅट्रीक डेटा देणे अनिवार्य असते. यामध्ये हतांचे ठसे, आयरीश स्कॅन (बुबुळांचे स्कॅनिंग)बरोबरच राहत्या घराचा पत्ता आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची गरज असते. मात्र बाल 'आधार'साठी जन्माचा दाखला आणि पालकांपैकी कोणत्याही एकाचे आधार कार्ड एवढेच कागपत्रे लागतात. त्यामुळेच साचीच्या जन्माच्या आधीपासूनच तिच्या वडिलांनी आधार कार्ड बनवणारे अधिकारी आणि काही मित्रांच्या मदतीने लवकरात लवकर साचीला आधार कार्डसाठी नोंदवण्याचे ठरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजीटल इंडिया घडवण्याचे स्वप्न असून त्यात खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने आपण हा प्रयत्न केल्याचे साचीच्या वडीलांनी सांगितले. त्यामुळेच मी माझ्या मुलीचे नाव लवकरात लवकर 'आधार'साराख्या महत्वाच्या योजनेसाठी नोंदवले आणि लवकरच ते मी इतर आवश्यक गोष्टींशीही लिंक करुन घेणार असल्याची माहिती साचीच्या वडिलांनी दिली. #Maharashtra: Parents of a new-born girl, Saachi, got her enrolled in Aadhaar within 1.48 minutes of her birth on 18 April in Buldhana's Khamgaon. (26.04.2018) pic.twitter.com/4zxHH5BM77 — ANI (@ANI) April 27, 2018 'मेरा आधार मेरी पेहचान' असे 'आधार'चे स्लोगन असल्याने माझ्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये तिचे नाव मी 'आधार'साठी नोंदवले. यासाठी मला मदत करणाऱ्या सर्व मित्रांचे आणि 'आधारा'च्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असल्याचेही साचीचे वडील म्हणाले. प्रत्येकाने आपले नाव आधार कार्डसाठी नोंदवले पाहिजे अशी अपेक्षा साचीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 'आधार'सारख्या सुविधांमुळे सरकारला त्यांच्या योजना आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत पोहचवणे अधिक सोप्पे जात असल्याने त्याचा नागरिकांना फायदा होतो असे मतही त्यांनी नोंदवले.