नगरः समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी परिवहन विभागाला (आरटीओ) जोरदार फटकारले आहे. आरटीओ सध्या काय करत आहे?, त्यांचे सर्व काम ऑनलाईन झाले असल्यामुळे कार्यालयात बसून राहण्या व्यतिरिक्त आरटीओला काही काम नाही, त्यांनी खरे तर महामार्गांवर फिरले पाहिजे. महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकडे लक्ष दिले पाहिजे. आरटीओंनी त्यांच्या कामात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे अशा शब्दात विखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विखे यांनी आज, शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातासंदर्भात नगरमध्ये बोलताना दुःख व हळहळ व्यक्त केली. मात्र त्याचबरोबर महामार्गांवरील सुरक्षिततेच्या उपायांची आवश्यकता ही व्यक्त करताना परिवहन विभागाला फटकारले आहे. आरटीओने महामार्गांवर धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसला नियमांचे पालन करायला लावणे भाग पाडले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा. ’समृद्धी’ मार्गावरील अपघातांच्या प्रश्नावर गडकरी दिल्लीत काय म्हणाले होते? हेही वाचा. लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग! समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे ते म्हणाले. असे भीषण अपघात टाळता आले पाहिजेत, खाजगी ट्रॅव्हल एजन्सीच्या बससाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, पूर्वी त्यांना 'स्टेज कॅरियर' म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव होता व एसटी महामंडळाच्या बसबरोबर सोडण्याचा विचार होता. त्याबाबत आता पूनर्रविचार केला पाहिजे. आरटीओने या खाजगी ट्रॅव्हल बसची 'पॉईंट टू पॉईंट' तपासणी केली पाहिजे, एसटी महामंडळाच्या यंत्रणेमार्फत या खाजगी ट्रॅव्हल एजन्सीच्या बसबाबत काही तपासणी यंत्रणा निर्माण करता येईल का याबाबतही उपाययोजना केली पाहिजे अशाही सूचना विखे यांनी केल्या.