राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केलाय. यावर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "या निवडणुकीत शिंदे गटाला किती यश मिळालं मला माहिती नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक पक्ष आम्हीच मोठा पक्ष असा दावा करतो," असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (२० डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, "निवडणुकीत शिंदे गटाला किती यश मिळालं मला माहिती नाही. निकाल जाहीर होत आहेत, ठिकठिकाणी गुलाल उधळला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक आघाडी आम्हीच 'नंबर वन' असाच दावा वर्षानुवर्षे करते. कारण या निवडणुका पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे जो पक्ष सत्तेवर असतो तो आम्ही जिंकलो असा दावा करतो." "आम्हीच पहिल्या क्रमांकाचा असे दावे अजूनही सुरू" "महाराष्ट्रात मी आत्ता जे निकाल पाहतो आहे ते नक्कीच 'काटे की टक्कर' आहे. आम्हीच पहिल्या क्रमांकाचा असे दावे अजूनही सुरू आहेत. दावे करायला काय हरकत आहे. त्यांना दावे करू द्या. शेवटी या राज्याची जनता विधानसभा आणि लोकसभेला ठरवेल. ग्रामपंचायत निवडणुकीला पक्षीय लेबल लावलं जात नाही," असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. "शिवसेनेने माहिती घेतली त्यानुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चांगलं यश मिळालं आहे, मिळत आहे," असंही राऊतांनी नमूद केलं. हेही वाचा : “हे भाजपाच्या नादाला कुठे लागलेत, मोर्चा…”, संजय राऊतांचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर "उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढले" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भुखंड प्रकरणावर बोलताना म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे, विधानसभा आणि विधानपरिषदेत नागपूरच्या भूखंडाबाबत विषय उपस्थित झाला. उच्च न्यायालयाने तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काही ताशेरे ओढले. ते अत्यंत गंभीर असल्याचं मी वृत्तपत्रात वाचले. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे."