“विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे उद्या लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील,” असा दावा शिवसेना उपनेत्या आणि उपसभातपती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला राज्यात मतदान झाले. उद्या (२४ ऑक्टोबर) उद्या कुणाचा ‘निकाल’ लागणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला किती जागा मिळणार यावर पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे. कसबा पेठ येथील पवळे चौकात दिवाळी सणानिमित्त ना नफा ना तोटा फराळ स्टॉलचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या,”यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मतदानावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. तसेच मागील पाच वर्षांत सरकारने चांगले काम केल्याचं, अनेक ठिकाणी नागरिकांनी पुढे येऊन बोलून दाखविलं आहे. त्यामुळे महायुतीला जनता पुन्हा काम करण्याची संधी देणार आहे. हे लक्षात घेता, शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. शिवसेनेने निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने, पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.