“शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात, अशी त्यांची कार्यपद्धती राहिली आहे”, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. ९ मे) शिरूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. आज शरद पवारांना या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपले परखड मत व्यक्त केले. “राजकारणामध्ये बालबुद्धी हे ज्यांचे वैशिष्ट आहे, असे अनेक लोक असतात. असे लोक बालबुद्धीने काही बोलत असतात. अशा लोकांकडे काय लक्ष द्यायचे?”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

शिरूरमध्ये एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शिरूर विधानसेभेचे आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशोक पवार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद दिल्यामुळे ते अजित पवार गटात गेले नाहीत. यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनी आपल्या गावराण शैलीत “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”, असा धमकीवजा इशारा दिला. यावरही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

“आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”; अजित पवारांचं शरद पवार गटाच्या आमदाराला खुलं आव्हान

शरद पवार म्हणाले, “लोकांच्या मतदानाचा अधिकार सरकारचा प्रतिनिधी स्वतःकडे घेत असेल तर यावर आता काय बोलणार? मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर काही पथ्य पाळण्याची जबाबदारी असते. त्यांची (अजित पवार) भाषा या चौकटीत बसणारी नाही. याबाबत आता जनतेनेच काय निर्णय घ्यायचा हे ठरवावे.”

‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”

नंदुरबार येथे जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याची ऑफर दिली. यावरही शरद पवारांनी भाष्य केले आहे. मोदींना आता तुमची गरज भासत आहे? असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले की, कुणाला काहीही गरज पडो, पण आम्ही ज्या विचारधारेत वाढलो, ज्या विचारधारेला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही.