कर्जत तालुक्यातील कळंब येथे अतिशय वाईट घटना घडली आहे. आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मतिया सर्फराज पटेल (वय – ९ वर्ष) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय – ७ वर्ष) अशी या मुलींची नावे आहेत. त्या दोघींचेही मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

रायगडमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून या दोन्हीही मुली आपल्या आईसोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने त्या नदीत पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या प्रवाहासोबत वाहत गेल्या. वेळीच मदत न मिळाल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचे प्राण गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.