लातूरमध्ये वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शीतल वायाळ या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरमध्ये हुंडाबळीची विदारक घटना घडली आहे. सोलापूरच्या मोहोळ येथे हुंड्याच्या जाचाला कंटाळून शहनाज मुलाणी या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्यांनी शहनाजकडे गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरच्यांकडून एक लाख रूपये आण, असा तगादा लावला होता. शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम गावची रहिवासी होती. ५ मे २०१५ रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तिचा पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून १९ एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर २० तारखेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.