विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित २०२२ मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण दिलं. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर बेतलेल्या या चित्रपटाची जगभरात चर्चा झाली. लोकांनी या चित्रपटाची प्रशंसा तर केलीच पण याचा विषय आणि त्याचं सादरीकरण यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला. प्रेक्षकांपासून बडेबडे सेलिब्रिटीज आणि राजकीय नेते यांनी या चित्रपटावर टीका केली.

आता दोन वर्षांनीही या चित्रपटावर आजही टीका होताना दिसत आहेत. नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनी या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’सारख्याच इतरही चित्रपटांना तिग्मांशु धुलिया यांनी सरसकट टुकार म्हणत हिणवलं आहे. याबरोबरच त्यांनी या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपटही म्हंटलं आहे.

‘रेड माईक चॅनल’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिग्मांशु धुलिया म्हणाले, “याप्रकारेचे चित्रपट अत्यंत बेकार असतात, कोण पाहतं हे चित्रपट? हे चालतही नाहीत. फक्त ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपटच चालला. मला यांच्याविषयी बोलायलाही आवडत नाही. हे सगळे अत्यंत टुकार चित्रपट आहेत.” याबरोबरच तिग्मांशु यांनी स्टीव्हन स्पीलबर्गसारख्या दिग्दर्शकांचं उदाहरण देत फिल्ममेकर्सबद्दल खुलासा केला आहे. स्पीलबर्गने स्वतः मान्य केलं आहे की त्याची दिग्दर्शक म्हणून अशी काहीच प्रतिमा नाही हे तिग्मांशु यांनी स्पष्ट केलं. तसेच दिग्दर्शकांच्या शैलीबद्दल बोलताना त्यांनी मार्टिन स्कॉर्ससे या हॉलिवूड दिग्दर्शकांचंही नाव घेतलं. मार्टिन यांचा चित्रपट ओळखण्यासाठी चित्रपटातील एक दोन शॉटच पुरेसे असतात असं तिग्मांशु म्हणाले. ते म्हणाले, “ज्या दिग्दर्शकांची विचारधारा ही भक्कम असते त्यांच्याकडेच एक विशिष्ट शैली तुम्हाला पाहायला मिळते.”

आणखी वाचा : “ही दुर्घटना नव्हती…” ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझर प्रदर्शित

पुढे तिग्मांशु म्हणाले, “सध्या भारतात एका विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचा प्रचार करण्यासाठी बरेच दिग्दर्शक प्रोपगंडा चित्रपट काढताना दिसत आहेत. आपण या चित्रपटांची विचारधारा जरी एकवेळ बाजूला ठेवली तरी कलात्मकदृष्टीनेही हे चित्रपट अत्यंत टुकार आहेत.” पुढे यावर भाष्य करताना तिग्मांशु यांनी हिटलरच्या प्रोपगंडावर बेतलेल्या ‘The triumph of the will’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “तुम्ही हा चित्रपट अवश्य पाहायला हवा, एका महिलेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, पण प्रोपगंडा चित्रपट असूनही कलात्मकदृष्ट्या तो एक उत्कृष्ट चित्रपट आहे. याने चित्रपटांची परिभाषाच बदलली.”

भारतात बनणाऱ्या प्रोपगंडा चित्रपटांबद्दल बोलताना तिग्मांशु म्हणाले, “भारतीय प्रोपगंडा चित्रपट हे कधीच इतके कलात्मकरित्या उत्कृष्ट नसतात, कारण ते बनवणाऱ्या दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा उद्देशच चुकीचा आहे. पैसा कमावणं हाच त्यांचा हेतू आहे.” तिग्मांशु धूलिया हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. ‘हासिल’, साहेब बिवी और गँगस्टर’, ‘पान सिंह तोमर’सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे तर ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये त्यांनी साकारलेली रामाधीर सिंह ही भूमिका प्रचंड गाजली.