‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेमधील सगळेच कलाकार खंडेरायाच्या दर्शनानिमित्त थेट जेजुरीला पोहचले आहेत. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय- अमृताचं नवरा- बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने सर्व विधी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीला गेले खरं पण, या विधी अमृताबरोबर पूर्ण करणे अक्षयला खूपच कठीण जात आहे.

जेजुरीला पोहोचताच घाडगे वाड्यावर अक्षय आणि अमृताच धुमधडाक्यात स्वागत झाले. नव्या नवरीप्रमाणे तिचा गृहप्रवेश वाड्यामध्ये करण्यात आला. हे सगळं बघून माईंना खूपच आनंद झाला. आता खंडोबाच्या दर्शनासोबतच अक्षय- अमृताच्या लग्नाचा जागरण- गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. जागरण- गोंधळाचा विधी निर्विघ्नपणे पार पडेल का? अमृताच्या समोर आणखी कोणते सत्य येणार आहे का? ते सत्य कळल्यावर माईंना हे सत्य अमृता सांगू शकेल का? हे सगळे प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी ‘घाडगे & सून’चे येणारे भाग पाहावे लागणार आहेत.

खंडेरायाचे दर्शन झाल्यानंतर प्रथेनुसार घरामध्ये जागरण- गोंधळ घालावा लागतो. त्यासाठीच घरामधील सगळे गोंधळाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये माई सगळ्यांना सांगतात की, या वाड्याच्या खालच्या खोलीमध्ये घाडगे घराण्याचा खजिना आहे आणि ज्याने कोणी त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न केले त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा नवी खेळी खेळणार आहे, ज्याबद्दल माई आणि संपूर्ण घाडगे परिवार अनभिज्ञ आहे. अमृताला वसुधाच्या या खेळी बद्दल कळेल का? घाडगे घरात घडणारा हा गोंधळात गोंधळ अमृता माईच्या मदतीने कसा दूर करेल हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.