नाटक. काहींसाठी मनोरंजनाचे तीन तास तर काहींचा श्वास. रंगभूमीकडे आता प्रेक्षक वळत नाहीत असा सूर आळवणारे भरपूर असतील पण त्यातही दिवसागणिक नवनवीन नाटकांची भर पडतेच आहे. रंगभूमीबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांसाठी हे एक उत्तरच असेल असे म्हणावे लागेल. तरुण पिढी रंगभूमीकडे वळत नाही या प्रश्नाचं उत्तर, तरुण पिढीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरनेच दिले आहे. नाटक हे फक्त कलाकार आणि प्रेक्षक यांच्यापुरतेच मर्यादित नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. तसं असतं तर एकांकिका स्पर्धांमध्ये मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज पहिले आले नसते. नाटक म्हणजे नेहमीच्या रहाट गाडग्यातून एक विरंगुळ्याचा क्षण. ही जरी मनोरंजनाची गोष्ट असली तरी याकडे आजही गांभीर्याने पाहिलं जातं हेही तितकेच महत्त्वाचं. माझ्यासाठी नाटक ही एक शिकण्याची संस्था आहे. रंगभूमीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाकडे त्याचा असा अनुभव असतो. प्रत्येक नाटक वेगळं, प्रत्येक प्रयोग वेगळा आणि त्यातले अनुभवही. आज फक्त विनोदी नाटकंच चालतात असं नाही. 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' अशा गंभीर नाटकांनाही हाऊसफुल्लची पाटी लागते. तसंच हा 'शेखर खोसला कोण आहे', '१०३', 'अमर फोटो स्टुडिओ' अशा वेगळ्या धाटणीची नाटकंही प्रेक्षकांनी उचलून धरली आहेत. त्यामुळे नाटक जर चांगलं असेल तर त्याला प्रेक्षक गर्दी करतातच. रंगभूमी ही एक साधना आहे. ज्यांना प्रसिद्धी हवी असते ते रंगभूमीकडे सहसा वळत नाहीत. पण ज्यांना रंगभूमीची जादू अनुभवायची असेल ते नाटकांशिवाय दूर राहूच शकत नाहीत. त्यातही ज्यांनी एकांकिका स्पर्धांची ती मजा, मस्ती, टेन्शन अनुभवले ते काही ना काही करुन रंगभूमीशी आयुष्यभर जोडलेच राहतात. सवाई स्पर्धेसाठी आमच्या एकांकिकेची निवड झाली होती. ज्या दिवशी अंतिम फेरी होती तेव्हा आम्ही पुण्यावरुन वेळेत पोहोचू की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणाचं टेन्शन काय असतं याचा अनुभव मी तेव्हा घेतला. पण सगळं काही सुरळीत होऊन आम्ही सवाईला पोहोचलो आणि ती स्पर्धा जिंकलीही. तो दिवस आणि ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही. शब्दांकन- मधुरा नेरुरकर madhura.nerurkar@indianexpress.com