दोन महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचंही वृत्त होतं. इम्रान आणि अवंतिका यांच्यातील भांडणं मिटवण्यासाठी एकीकडे दोघांच्या कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू असताना आता स्वत: इम्राननेही नातं वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय.

अवंतिका मुलीसोबत सध्या आईवडिलांकडे राहत आहे. तिच्या वाढदिवशी इम्रानने फुलांचा गुच्छ आणि त्यासोबत एक पत्र लिहून पाठवलं. या पत्रात त्याने अवंतिकाची माफी मागितली आहे. पत्नीला घरी परत आणण्यासाठी इम्रानने हा छोटासा प्रयत्न केला आहे.

इम्रान आणि अवंतिका यांची प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. २०११ साली इम्रान आणि अवंतिकाचा विवाह झाला होता. लग्न करण्यापूर्वी इम्रान आणि अवंतिका जवळपास आठ वर्ष एकत्र होते.

इम्रान खान हा आमिर खानचा भाचा असून २००८ साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता पण त्यानंतर मात्र इम्रान बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला. ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘देल्ली बेल्ली’, मेरे ब्रदर कि दुल्हन’, ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.