‘बिग बॉस’चं यंदाचं सिझन सर्वाधिक चर्चेत राहिलं. या शोमधील विविध टास्क, टास्कदरम्यान झालेली जुगलबंदी, सलमान खानचं सूत्रसंचालन या सर्व गोष्टींमुळे हा शो टीआरपीच्या यादीतही बाजी मारतोय. म्हणूनच यंदाचा सिझन पाच आठवड्यांनी वाढवण्यात आला. मात्र आता सलमान यातून काढता पाय घेत असल्याची चर्चा होत आहे. आजारपणामुळे सलमान हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं जात होतं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने अद्याप शो सोडण्याचा निर्णय घेतला नाही. या शोच्या सुरुवातीपासून स्पर्धकांमध्ये वादविवाद आहेत. केवळ शाब्दिक नव्हे तर अनेकदा स्पर्धकांमध्ये हाणामारीसुद्धा झाली. हे सर्व सलमान आतापर्यंत सूत्रसंचालक म्हणून संयमाने हाताळत होता. पण या शोमुळे सलमानवर अधिक ताण येत असल्याने कुटुंबीयांनी त्याला शो सोडण्यास सांगितल्याचं म्हटलं जातं होतं.

आणखी वाचा : पुरस्कार न दिल्याने भडकला शाहिद; परफॉर्म न करता कार्यक्रमातून पडला बाहेर 

सलमान गेल्या काही काळापासून ‘ट्रिजेमिनल न्यूरेल्जिया’ (Trigeminal Neuralgia) या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्यानं जास्त ताण घेणं त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मागच्या काही आठवड्यांपासून सलमान शोमध्ये रागावलेला व तणावाखाली दिसत होता. एका एपिसोडमध्ये तर रागात त्याने स्वत:चं जॅकेटसुद्धा फेकून दिलं होतं. यामुळे सलमानचे कुटुंबीय त्याच्या तब्येतीसाठी चिंतेत आहेत.